गटातटांत विखुरलेला रिपब्लिकन पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 03:09 AM2019-04-26T03:09:59+5:302019-04-26T03:12:21+5:30

ब्राह्मण्यवाद व भांडवलशाही यांना विरोध करण्यासाठी आणि भारतीय कामगार व जातिअंताची लढाई यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ साली इंडियन लेबर पार्टी नावाची राजकीय संघटना स्थापन केली

Editorial on Republican Party divided in politics | गटातटांत विखुरलेला रिपब्लिकन पक्ष

गटातटांत विखुरलेला रिपब्लिकन पक्ष

Next

संजीव साबडे 

ब्राह्मण्यवाद व भांडवलशाही यांना विरोध करण्यासाठी आणि भारतीय कामगार व जातिअंताची लढाई यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ साली इंडियन लेबर पार्टी नावाची राजकीय संघटना स्थापन केली, तेव्हा कम्युनिस्टांनी नाराजी व्यक्त केली होती. कामगारांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका कम्युनिस्टांनी तेव्हा केली. त्यावर तुम्ही कामगारांच्या हक्कांसाठी लढता, पण दलित कामगारांसाठी लढत नाही, असे उत्तर बाबासाहेबांनी दिले होते. पुढे १९३७ च्या प्रांतिक निवडणुकांमध्ये या पक्षाने १७ पैकी १४ जागाही जिंकल्या.

डॉ. आंबेडकर यांनी १९४२ साली शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. याचा उल्लेख मुद्दाम करण्याचे कारण आधीच्या संघटनेच्या नावात कामगार (लेबर) हा शब्द होता, तर नव्या पक्षाच्या नावातून अनुसूचित जातींची संघटना हे स्पष्ट होत होते. अर्थात त्याआधी १९३0 मध्येही डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन स्थापन केली होती. पुढे शेड्युल कास्ट फेडरेशनमधूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष निर्माण झाला. या पक्षाच्या नावात इंडिया हा शब्द असला तरी पक्षाचे बहुतांशी राजकारण केवळ महाराष्ट्रातच होते आणि आजही आहे.
पण आज या पक्षाचे इतके गट-तट आहेत की त्या पक्षाचे महत्त्व आणि प्रभाव दोन्हीही महाराष्ट्रात फारसा शिल्लक राहिलेला नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश डॉ. आंबेडकर यांनी दलित जनतेला दिला. दलित अस्मितेला त्यांनी घातलेली ही सादच होती. त्यातून महाराष्ट्रात अनेक दलित साहित्यिक व विचारवंत तयार झाले. दलित साहित्य हा नवा साहित्यप्रकार जन्माला आला. कार्यकर्त्यांनी खूप संघर्षही केला. नेत्यांनी मात्र त्यातील संघटितपणाचा सल्ला आपल्या राजकीय स्वार्थासाठी बाजूला ठेवला. अनेक गट तर केवळ सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला गेले आणि त्यातून नेत्यांनी स्वत:साठी सत्तेची पदे मिळवली.

आजच्या घडीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेमके किती गट आहेत, हे या नेत्यांनाही सांगता येणार नाही. काहींच्या मते किमान ५0 गट असावेत. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, राजेंद्र गवई, जोगेंद्र कवाडे, बी. सी. कांबळे, राजाभाऊ खोब्रागडे, टी. एम. कांबळे या नेत्यांनी आपापला रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. शिवाय गाणार गट, शांताबाई दाणी गट यांचेही गट काही काळ सक्रिय होते. त्यापैकी रामदास आठवले आज केंद्रात भाजपच्या मदतीने सत्तेत आहेत, तर आधी काँग्रेसच्या मदतीने राज्यात मंत्री होते. बी. सी. कांबळे १९७७ साली जनता पार्टीच्या साह्याने विजयी झाले.

प्रकाश आंबेडकर यांना व्ही. पी. सिंग यांच्यामुळे राज्यसभा सदस्यत्व मिळाले. काँग्रेसशी जवळीक साधणारे रा. सू. गवई अनेक वर्षे विधान परिषदेचे उपसभापती तसेच बिहार व केरळचे राज्यपाल होते. असेच एक नेते आर. डी. भंडारे काही काळ रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते. ते पुढे काँग्रेसमध्ये गेले आणि मग बिहार व आंध्र प्रदेशचे राज्यपालपद भूषविले. राजाभाऊ खोब्रागडे हे बाबासाहेबांचे जवळचे सहकारी होते. ते अनेक वर्षे राज्यसभेवर होते. पां ना. राजभोज पुढे काँग्रेसमध्ये गेले. दादासाहेब रूपवते व त्यांच्या सहकाऱ्यांनीही तोच मार्ग अवलंबला. गंमत म्हणजे हे नेते ज्या भागातील, तिथेच त्यांचे समर्थक तयार झाले. त्यामुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा, नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील दलित समाज तेथील नेत्यांच्या मागे उभा राहिला. त्यामुळे ते नेते राज्याचे नव्हे, तर त्या भागाचे झाले.

थोडक्यात, या सर्व नेत्यांना सत्तेतील पदे मिळाली, पण रिपब्लिकन कार्यकर्त्यांना काहीच मिळाले नाही. किंवा फारच किरकोळ पदांवर त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेसने सातत्याने रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांना हाताशी धरून दलित व्होट बँक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. त्यात यशही आले. आता भाजपने आठवले गटाला जवळ केले आहे. या सर्व प्रकारांमुळे पक्षाची मात्र अधिकाधिक शकले होत गेली. एकदा सर्व रिपब्लिकन गट एकत्र आले, तेव्हा आठवले, आंबेडकर, गवई व कवाडे असे चौघे जण लोकसभेवर निवडून गेले होते. म्हणजेच एकत्र आल्याचा राजकीय फायदा त्या पक्षाला मिळू शकतो, हे स्पष्ट होते. उत्तर प्रदेशात बसपने राज्याची एकहाती सत्ता मिळवली. या नेत्यांना मात्र स्वत:पुरते पद मिळवता आले.

अतिशय हुशार, अभ्यासू नेते आणि कार्यकर्ते. त्यांच्या निष्ठाही अढळ. कार्यकर्ते तर शिवसैनिकांप्रमाणेच आक्रमक. नेते व कार्यकर्त्यांनी अनेक मोठी आंदोलने महाराष्ट्रात केली. पण नेत्यांचा इगोच सतत आडवा येतो. केंद्रात मंत्री असलेल्या रामदास आठवले गटाचा लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार नाही. तरीही ते प्रचार करत आहेत भाजप व शिवसेनेचा. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमच्या ओवेसींना हाताशी धरून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. गवई, कवाडे गट काँग्रेससोबत आहेत.

या रिपब्लिकन नेत्यांच्या इगोला कंटाळून नामदेव ढसाळ यांनी दलित पँथर स्थापन केली. ही संघटना खूपच आक्रमक होती. महाराष्ट्र हादरवून टाकण्याची ताकद पँथरमध्ये होती. पण पँथर नेतेही सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला गेले. मग त्यातही फूट पडली. महाराष्ट्रातील दलित चळवळीला जणू फुटीचा शापच आहे. नेत्यांनी, गटांनी एकत्र यावे, असे सर्वच रिपब्लिकन कार्यकर्त्यांना वाटते. पण जे आतापर्यंत झाले नाही, ते पुढे तरी कसे होणार?

एकदा सर्व रिपब्लिकन गट एकत्र आले, तेव्हा आठवले, आंबेडकर, गवई व कवाडे असे चौघे जण लोकसभेवर निवडून गेले होते. म्हणजेच एकत्र आल्याचा राजकीय फायदा त्या पक्षाला मिळू शकतो, हे स्पष्ट होते. उत्तर प्रदेशात बसपने राज्याची एकहाती सत्ता मिळवली. या नेत्यांना मात्र स्वत:पुरते पद मिळवता आले.
 

Web Title: Editorial on Republican Party divided in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.