Ashadhi Wari 2025: देहूत श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:31 IST2025-06-12T12:30:32+5:302025-06-12T12:31:36+5:30
- सोहळा ३५ दिवसांचा, संस्थानच्या वतीने वारीदरम्यान २५ ते ३० तंबूंची तयारी; शिधा व साहित्याची खरेदी

Ashadhi Wari 2025: देहूत श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
- राजेंद्र काळोखे
देहूगाव : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने ३४० व्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्णत्वास आली आहे. वारीदरम्यान २५ ते ३० तंबूंची तयारी केली आहे. शिधा व साहित्याची खरेदीही झाली आहे.
पालखी सोहळ्याच्या तयारीला मार्च (फाल्गुन) महिन्यातच सुरुवात होत असते. तेव्हापासूनच साहित्याची जुळवाजुळव करण्याची सुरुवात होते. पालखी सोहळा किमान ३५ दिवसांचा असतो. या कालावधीत विविध ठिकाणी पालखीचे मुक्काम असतात. राहण्यासाठी ठिकठिकाणी राहुट्या पडतात. संस्थानच्या वतीने २५ ते ३० तंबूंची तयारी केली आहे. तंबूसाठी दोर, खुंट्या, लोखंडी पाइप याची खरेदी, दुरुस्ती व देखभाल करून झाली आहे.
श्री संत तुकाराम महाराज संस्थानची देहूकर दिंडीत सहभागी वारकऱ्यांसाठी लागणारा शिधा, गॅस, पालखीसाठीचे साहित्य, टाळ-मृदंग तयार ठेवले आहेत. वारीदरम्यान १९ दिवसांच्या अन्नधान्याची खरेदी पुण्यातील मार्केट यार्डमधून झाली आहे. मंदिरात सध्या ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. त्यांच्या मदतीने गर्दीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदरमहाराज मोरे, सोहळा प्रमुख गणेशमहाराज मोरे, दिलीपमहाराज मोरे, वैभवमहाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंहमहाराज मोरे, लक्ष्मणमहाराज मोरे व उमेशमहाराज मोरे कामांवर लक्ष ठेवून आहेत.
रथापुढे २७ आणि मागे ३९० दिंड्या
तीन वर्षांपासून पालखी सोहळ्यात नवीन दिंड्यांची नोंदणी करून घेतली असल्याने यावर्षी पालखी रथापुढे २७ व मागे ३९० दिंड्या चालणार आहेत. त्यांचे चालक मालक व फडकऱ्यांना पालखी कार्यक्रमाची माहिती दिली आहे. शासकीय खात्यांशी पत्रव्यवहार पूर्ण झाला आहे.
शासकीय पातळीवरही सज्जता
शासकीय पातळीवरही जोरदार तयारी सुरू असून, आमदार सुनील शेळके, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने व तहसीलदार जयराज देशमुख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, चेतन कोंडे यांनी देहूत आढावा बैठका घेतल्या आहेत. पालखी रथ, गरूड टक्के, पूजेची भांडी, थाळ, पाट, चौरस, मुख्य मंदिरातील प्रभावळ, दरवाजे, चौकटींना चकाकी देण्याचे काम झाले आहे.