आळंदीतील अवैध आध्यात्मिक संस्थेवर छापा; २१ बालकांची सुटका; नेमकं काय घडलं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:30 IST2026-03-13T18:29:08+5:302026-03-13T18:30:51+5:30
‘चिल्ड्रन हेल्पलाईन १०९८’वर प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत या संस्थेतील २१ मुलांची सुरक्षित सुटका केली आहे.

आळंदीतील अवैध आध्यात्मिक संस्थेवर छापा; २१ बालकांची सुटका; नेमकं काय घडलं ?
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी येथील खंडोबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या एका अनधिकृत आध्यात्मिक शिक्षण संस्थेत बालकांचे लैंगिक, शारीरिक आणि मानसिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘चिल्ड्रन हेल्पलाईन १०९८’वर प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत या संस्थेतील २१ मुलांची सुरक्षित सुटका केली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ८ मार्च २०२६ रोजी या संस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान १३ वर्षीय बालकाचे गंभीर शोषण झाल्याची बाब समोर आली, तसेच येथील महाराजांकडून मुलांना मारहाण होत असल्याचेही निष्पन्न झाले. धक्कादायक म्हणजे, या संस्थेकडे निवासी विद्यार्थी ठेवण्याचा कोणताही वैध शासकीय परवाना उपलब्ध नव्हता.
संस्थेच्या पाहणीत नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले. येथे मुलांच्या प्रवेशाचे कोणतेही रेकॉर्ड नव्हते, सुरक्षेसाठी कर्मचारी वर्ग नव्हता आणि स्वच्छतेचा मोठा अभाव होता. पुरेशी स्नानगृहे, प्रथमोपचार पेटी, तक्रार पेटी किंवा आपत्कालीन क्रमांकांचे फलक अशा प्राथमिक सुविधाही येथे उपलब्ध नव्हत्या. मुलांच्या भोजनाचा कोणताही निश्चित आहार तक्ता पाळला जात नव्हता.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत बालकल्याण समितीच्या आदेशानुसार, संस्थेतील २१ मुलांना सुरक्षितरीत्या शासकीय मान्यताप्राप्त बालगृहात हलवण्यात आले आहे. ही कारवाई बालस्नेही टास्क फोर्स आणि आळंदी नगरपालिकेच्या मदतीने पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत पोलिस निरीक्षक भीमा नरके, अली अन्सारी, संगीता लोखंडे आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी सहभागी होते.