शेतीमाल खराब होण्याची भीती; नुकसानीची भरपाई कोण करणार? शेतकऱ्यांना कोंडीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:46 IST2026-02-05T10:40:28+5:302026-02-05T10:46:42+5:30
वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

शेतीमाल खराब होण्याची भीती; नुकसानीची भरपाई कोण करणार? शेतकऱ्यांना कोंडीचा फटका
लोणावळा :पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातामध्ये गॅस गळती झाली. गेल्या २४ तासांपासून वीस ते पंचवीस किलोमीटरच्या वाहतुकीच्या रांगा होत्या. हजारो वाहनचालक अडकून पडले आहेत. हजारो वाहन प्रवासी तासनतास वाहतूक बंद असलेल्या कार, बसमध्येच अडकले होते. कोणी पहाटे चार वाजल्यापासून, तर कोणी रात्री तीन किंवा पाच वाजल्यापासून या ठिकाणी अडकले होते.
वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. काहींना विमानतळावर पोहोचायचे आहे, तर काहींना दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी पोहोचायचे आहे, तर काहींना शेतीमाल मुंबई आणि विमानतळावर पोचवायचा होता. पाणी, अन्न व शौचालयांची सुविधाही अपुरी असल्याने प्रवाशांचे हाल झाले.
पर्यायी मार्गांचा वापर, आर्थिक नुकसान
स्थानिक प्रशासन आणि राज्य महामार्ग पोलिसांनी पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ताम्हिणी आणि माळशेज मार्ग नेण्याचे आवाहन केले होते. आडोशी बोगद्याजवळील गॅस गळतीच्या घटनेमुळे एक्सप्रेस-वे आणि जुना हायवे दोन्ही ठप्प आहेत. प्रवाशांनी पुणे, पौड ताम्हिणी घाट, माणगाव मार्गे मुंबईला गेले. तर काहीजण माळशेज घाट मार्गचा वापर केला. पुणे-चाकण-नारायणगाव-माळशेज घाट-कल्याणमार्गे ठाणे गाठले. त्यामुळे प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढल्याचे वाहनचालकांनी सांगतिले. तसेच बचाव आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. पोलिस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इंधन, गॅसतज्ज्ञ पथक तैनात होते. गॅस समस्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.
पहाटेपासून आम्ही वाहतूक कोंडीमध्ये अडकलो असून, आमच्याबरोबर लहान-लहान मुले आहेत. पाणी पिण्यासाठी आणि वॉशरूमसाठी आमचे प्रचंड हाल झाले असून, लोणावळा शहरातील पोलिस बांधवांनी आम्हाला पाणी आणि वडापावची सोय करून दिली; परंतु आमच्या लहान मुलांची खाण्याची सोय झाली नाही. - महिला प्रवासी
पहाटे चार वाजल्यापासून आम्ही या ट्रॅफिकमध्ये अडकलो असून, प्रचंड हाल सहन करावे लागले आहेत; परंतु काही पोलिसांनी येऊन आम्हाला पाण्याची आणि खाण्याची सोय करून दिली. काही फेरीवाल्यांना या ठिकाणी बोलावून त्यांच्याकडून आम्हाला आइस्क्रीम वगैरेंची सोय करून दिली. त्याबद्दल आम्ही पोलिसांचे खूप खूप आभारी आहोत. - कर्नाटक राज्यातून आलेले प्रवासी
रात्री नऊ वाजल्यापासून आमची वाहने या ठिकाणी उभे आहेत. या सर्व वाहनांमध्ये शेतीमाल घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने चाललो आहे. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, उन्हामुळे हा माल खराब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होणार असून या झालेल्या नुकसानीची भरपाई आम्ही कशी करायची? या ठिकाणी आमची खाण्यापिण्याची कसलीही नाही आणि या भरलेल्या मालाची वाहने सोडूनही आम्हाला जाता येत नाही. आमच्या शेतीमालाचा विचार करून शासनाने याची दखल घ्यावी. - शेतकरी