उद्योजकांच्या जागा वगळून गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण; प्राधिकरणाचा डीपी प्लॅन रद्द, अजित पवारांची माहिती
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: April 25, 2025 20:18 IST2025-04-25T20:18:04+5:302025-04-25T20:18:24+5:30
बिल्डर अन् उद्योजकांच्या जागा वगळून गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण टाकलेली आहेत, अशा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या होत्या

उद्योजकांच्या जागा वगळून गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण; प्राधिकरणाचा डीपी प्लॅन रद्द, अजित पवारांची माहिती
पिंपरी : पीएमआरडीएचा डीपी प्लॅन बनविताना बिल्डर अन् उद्योजकांच्या जागा वगळून गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण टाकलेली आहेत, अशा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या. हे पाहता मुख्यमंत्र्यांनी पीएमआरडीचा डीपी प्लॅन रद्द केला, असा खुलासाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
पीएमपीएमएलच्या चऱ्होली तसेच माण येथील इ-डेपोचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दिपाली मुधोळ-मुंडे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होेते.
अजित पवार म्हणाले, “ चऱ्होली डेपोला ६० आणि माणला ३० बस देण्यात येतील. यामध्ये पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ६० ते ४० टक्के हिस्सा दिला जात आहे. बसमध्ये आमूलाग्र बदल झाले. पर्यावरणपूरक बस धावत आहेत. तसेच पीएमपीएमएलला नवीन २३० कोटींच्या टाटाच्या ५०० बसेस घेणार आहोत. यासाठी पीएमआरडीएने पीएमपीएमएलकडे निधी दिला आहे. सोबतच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणखी निधी पुरवेल. जवळपास दीड हजार बस ताफ्यात असतील. ”
पिंपरी-चिंचवड शहरासाठी २०४१ चे नियोजन....
पवार म्हणाले, “ पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ही ४२ लाखांच्या घरात जाईल. कदाचित येत्या लोकसभेत पिंपरी-चिंचवडचा स्वतंत्र खासदार होईल. वाढती लोकसंख्या पाहता त्या पद्धतीने सगळे नियोजन करत आहोत. शहरासाठी भामा, आसखेड, ठोकरवाडी, मुळशी, पवना धरणातून पाणी आणले जाणार आहे.
कुटुंबियांची भेट घेणार...
पवार म्हणाले, “ पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना धडा शिकवायला हवा. या हल्ल्याला असे प्रतिउत्तर देऊ, जेणेकरून पुन्हा हल्ला करण्याची हिंमत कोणी करणार नाही. दोन दिवस एकनाथ शिंदे, आत्ता गिरीश महाजन जम्मू काश्मीरमध्ये आहेत. तिथे अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आता आजचे कार्यक्रम संपवून हल्ल्यात पुण्यातील मृत पावलेल्या कुटुंबियांचे सांत्वन करायला जाणार आहे.
स्वतःच्या पीएचे कान टोचले....
पुणे-पिंपरी चिंचवड शहरात ३० लाख घरांचा कार्यक्रम अल्पउत्पन्न गटासाठी घेत आहोत. त्यावेळी त्यांना २० की ३० लाख घरांचा आकडा आठवत नव्हता. त्यावेळी पवारांनी ओये चोबे, कुठे गेला चोबे, ये चोबे, कोणाशी बोलतोय रे? इथे मी काय विचारतोय. असे म्हणत अजित पवारांनी स्वतःचे स्वीय सहाय्यक रामचंद्र चोबेंचे कान टोचले.
गरिबांनाही एसीत फिरता यावं...
पवार म्हणाले, “सध्या उन्हाचा पारा चांगलाच चढतोय, उष्माघाताचा अनेकांना त्रास होतोय. अशात श्रीमंत तर एसीमध्ये फिरू शकतोय. पण कॉमनमॅनला एसीत बसून प्रवास करता यावा, यासाठी आपण अधिकाधिक बस एसी करण्याच्या दृष्टीने आपण विचार करुयात.”