Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:12 IST2025-06-07T17:06:58+5:302025-06-07T17:12:44+5:30

Diabetes Sign: भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. पण याच भारताला जगात मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. याचाच अर्थ इथे मधुमेहींची संख्या सर्वात जास्त आहे. दुर्दैवाने सगळ्या वयोगटाचे रुग्ण यात समाविष्ट आहेत. हे चित्र बदलणे शक्य आहे. त्यासाठी मधुमेह होण्यापूर्वी निदान(Five sign of Diabetes) होणे गरजेचे आहे. ते कसे करायचे ते पाहू!

मधुमेह एका रात्रीत होणारा आजार नाही. शरीरात साखरेचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढत जाते आणि आपले शरीर आपल्याला त्याची पूर्वसूचनाही देते. मात्र शरीरातील बदल आपण दुर्लक्षित करतो आणि मधुमेह झाल्यावर आयुष्यभर पथ्य पाळत बसतो. यासाठी लक्षणं दिसू लागताच कारवाई होणे आवश्यक आहे.

मधुमेह आणि रक्तदाब हे दोन्ही आजार सर्दी, ताप, खोकल्यासारखे सामान्य झाले आहेत. घरटी एक दोन रुग्ण सहज सापडू लागले आहेत. घरात चार पिढ्यांची आजाराची हिस्ट्री आहे हे माहीत असूनही आपल्या दिनचर्येवर, आहारावर नियंत्रण न मिळवण्याचे दुष्परिणाम म्हणून हे आजार वारसा हक्काने पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात. पण त्याला रोखणे शक्य आहे का? हो नक्कीच आहे!

त्यासाठी शरीरात होणारे पुढील बदल वेळीच लक्षात घेतले पाहिजेत. आहारात आवश्यक बदल केले पाहिजे. शारीरिक हालचाली, व्यायाम, चालणे सुरु करून रक्तातील साखर नियंत्रणात आणली पाहिजे. आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आयुष्यभर आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी वेळीच सावध पवित्रा घेऊन पुढील लक्षणं दिसू लागताच सतर्क झाले पाहिजे.

जेव्हा डाएट न करता किंवा कोणताही व्यायाम न करताही वजन वेगाने कमी होत असेल आणि लोक तुमची स्तुती करत असतील तर हुरळून जाऊ नका, हे फिटनेसचे नाही तर मधुमेहाचे लक्षण असू शकते, त्यामुळे सावध व्हा.

झोपेचे तास भरले तरी झोप पूर्ण न होणे आणि उठल्यावर दिवसभर थकवा जाणवत राहणे ही धोक्याची घंटा असू शकते. रक्तात साखर वाढल्याने ती पेशींपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे शरीरात ऊर्जा तयार होत नाही.

अनेकांचा लघवीचा ताबा सुटतो. वारंवार जावे लागते आणि खूप तहान लागते. हे लक्षण मधुमेहाचे असू शकते. कारण, जेव्हा शुगर वाढते तेव्हा ती शरीराबाहेर काढण्यासाठी मूत्रपिंड वारंवार लघवी बनवते आणि शरीरातले पाणी वापरले गेल्यामुळे खूप तहान लागते.

दृष्टी अंधुक झाल्यासारखी वाटणे किंवा चष्म्याचा नंबर बदलणे हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. कारण डायबिटिस पेशंटचे शरीर आतून पोकळ होत जाते आणि एकेका इंद्रियाची शक्ती कमकुवत होत जाते. त्यात सर्वात आधी डोळ्यांवर परिणाम दिसू लागतो. दृष्टी अंधुक होते तसेच चष्म्याचा नंबर वाढतो.

एखादी जखम दीर्घकाळ बरी न होणे किंवा वारंवार आजारी पडणे हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. मधुमेहामुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नाही आणि प्रतिकार शक्ती कमकुवत होते त्यामुळे एखादा आजार तात्पुरता बरा होतो आणि काही काळाने पुन्हा बळावतो.

ही पाच प्राथमिक लक्षणं दुर्लक्षित करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहारात योग्य बदल करून औषधोपचार सुरु करा, जेणेकरून मधुमेह नियंत्रणात येण्यास मदत होईल आणि निरोगी जीवन जगता येईल.