ज्या पक्षासोबत स्थापन केली सत्ता, त्याच मित्राला भाजपनं दिला झटका; ६ आमदार फोडले

By कुणाल गवाणकर | Published: December 26, 2020 03:07 PM2020-12-26T15:07:58+5:302020-12-26T15:11:24+5:30

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप क्रमांक दोनचा पक्ष ठरला. भाजपनं जेडीयूसोबत लढत सत्ता कायम राखली.

भाजपनं जेडीयूपेक्षा जास्त जागा जिंकल्या असल्या तरीही मुख्यमंत्रिपद ठरल्याप्रमाणे जेडीयूच्या नितीश कुमार यांच्याकडे कायम ठेवलं. मात्र नव्या सरकारमध्ये भाजपचा वरचष्मा आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू थेट तिसऱ्या क्रमांकावर गेला. जेडीयूच्या आमदारांची संख्या ७१ वरून ४३ वर आली.

बिहारमध्ये निवडणुकीत मोठा फटका सहन कराव्या लागलेल्या जेडीयूला आता अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं झटका दिला आहे.

जेडीयूचेच्या सातपैकी सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जेडीयू बिहार आणि केंद्रात भाजपसोबत असताना भाजपनं अरुणाचल प्रदेशात मित्रपक्षाला जोरदार धक्का दिला आहे.

जेडीयूच्या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्ताला भाजप प्रदेशाध्यक्ष बी. आर वाघे यांनी दुजोरा दिला. आम्ही त्यांना पक्षात सामील करून घेतलं असल्याचं ते म्हणाले.

जेडीयूचे सहा आमदार भाजपमध्ये गेल्याच्या वृत्ताला जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनीदेखील दुजोरा दिला. याबद्दल पक्ष बैठक घेईल, असं त्यांनी सांगितलं.

भाजपमध्ये गेलेल्या सहापैकी तीन आमदारांना जेडीयूनं कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ही नोटीस दिली गेली होती.

भाजपचं कमळ हाती घेतलेल्या सहा आमदारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना न कळवता तालेम तबोह यांची निवड विधिमंडळ गटनेते म्हणून केले. हा निर्णय परस्पर घेण्यात आला.

पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलच्या (पीपीए) एकमेव आमदारानंदेखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ६० आमदार असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेतील भाजप सदस्यांची संख्या ४१ वरून ४८ वर पोहोचली आहे.