'रॉ' चे 'सुपर बॉय', एक कॉल अन् ऑपरेशन रद्द; दाऊदनेच पसरवली विषप्रयोगाची अफवा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 11:11 AM2023-12-27T11:11:38+5:302023-12-27T11:20:55+5:30

काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवर विषप्रयोग झाल्याची बातमी समोर आली होती. तो रुग्णालयात दाखल असून प्रकृती गंभीर असल्याचेही सांगितले होते.

दाऊद बाबतच्या अफवा याआधीही माध्यमात आल्या होत्या. आताची ही अफवा पसरवण्याची ही चौथी घटना आहे.

२०१६ मध्येही दाऊदबाबत अशीच एक अफवा पसरली होती. यात दाऊदला गँगरीन होऊन त्याचा पाय कापावा लागल्याचे सांगितले होते.

तर २०१७ मध्ये दाऊदचा ब्रेन ट्यूमरने मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. कोरोना साथीतही अशीच अफवा पसरली होती. पण, दाऊद नव्हे तर त्याचा पुतण्या सिराज कासकरचे निधन झाल्याचे नंतर उघडकीस आले होते.

अनेकवेळा दाऊदच्या मृत्यूच्या अफवा समोर येतात. या अफवा दाऊदच पसरवत असल्याचा अदमास तपास यंत्रणा घेत आहेत.

मागिल दोन वर्षापासून भारतात घातपात घडवणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये हलकल्लोळ माजला आहे. या काळात पाकिस्तानात १६ मोठे दहशतवादी वेगवेगळ्या हल्ल्यात अज्ञात मारेकऱ्यांकडून मारले गेले आहेत. त्यांच्या हत्येची जबाबदारी अजुनही कोणी घेतलेली नाही.

काही दिवसांपूर्वी कॅनडात राहून खलिस्तानवादी चळवळीला खतपाणी घालणाऱ्या हरदीपसिंग निज्जर याची अशाच प्रकारे हत्या झाली, तर गुरपत सिंग पांनू याच्या हत्येचा प्रयत्न झाला. लष्कर-ए-तोयबाचा सदस्य साजिद मीर याचीही विष देऊन हत्या करण्यात आली. मुंबईवरील हल्ल्यात त्याचा सहभाग होता. या घटनांमुळे भारतावर अतिरेकी कारवाया करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

यामुळेच दाऊदला भीती वाटत आहे का आणि त्यामुळेच सुरक्षा वाढवावी म्हणून त्यानेच विषप्रयोगाची अफवा पसरवली का, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणेला पडला आहे.

अमेरिकेत ट्विन टॉवरवर विमानहल्ला घडवणाऱ्या अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने याच पाकिस्तानात शोधून यमसदनी पाठवले होते. पण, भारत ३० वर्षांत दाऊदच्या केसाला धक्का लावू शकलेला नाही, याचे वैषम्य इथल्या जनतेला वाटत आहे.

२०१३ मध्ये 'रॉ'ने मोठा कट रचत दाऊदला संपण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी एक टीमही तयारी केली होती. ही टीम त्या ठिकाणी पोहोचलीही होती पण ऐनवेळेला या टीमला शंका निर्माण करणारा एक फोन आला आणि सर्व योजनाच रद्द करावी लागली, हा फोन नेमका काय आणि कोणाचा होता याची चर्चा आजही अधिकाऱ्यांमध्ये सुरू असते.

दुबईतील दाऊदच्या मुलीच्या लग्न सोहळ्यावेळीही अशीच योजना छोटा राजन टोळीच्या मदतीने रचण्यात आली होती. पण, या योजनेतील गुंडांना मोहिमेवर जाण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी अटक केली आणि योजना बारगळली. त्यामुळे दाऊदबाबत भारत सरकारला नशीब कधी साथ देतेय, असाच सवाल केला जात आहे.