...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:06 IST2025-06-27T10:56:34+5:302025-06-27T11:06:50+5:30

Parenting In India: भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. मात्र आता भारतातील लोकसंख्येबाबत एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. भारतातील जन्मदर सातत्याने घटत आहे. तसेच त्यामागची धक्कादायक कारणंही समोर आली आहेत.

प्रचंड वाढत असलेली लोकसंख्या हे स्वातंत्र्योत्तर काळात भारतासमोरील मोठं आव्हान बनलेलं आहे. आज भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. मात्र आता भारतातील लोकसंख्येबाबत एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. भारतातील जन्मदर सातत्याने घटत आहे. भारतीयांची कमी मुलांना जन्म देण्याची इच्छा नाही, मात्र आर्थिक चणचणीमुळे ते हतबल आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या पॉप्युलेशन फंडच्या जागतिक लोकसंख्येची स्थिती या नव्या अहवालात म्हटले आहे.

जगभरातील १४ देशांच्या करण्यात आलेल्या या अध्ययनामधून मिळालेल्या माहितीनुसार बहुतांश लोकांना दोन मुलांना जन्म द्यायचा आहे. भारतामध्ये ४१ टक्के महिला आणि ३३ टक्के पुरुषांना दोन मुलांचं कुटुंब हवं आहे. मात्र भारतामध्ये जननदर घटून १.९ एवढा झाला आहे. हा दर २.१ या सरासरीपेक्षा कमी आहे. हा दर जागतिक कलाप्रमाणे असला तरी त्यामागची खरी गोष्ट चिंता वाढवणारी आहे.

या अहवालामध्ये जोडपी कमी मुलांना का जन्म देत आहेत, याबाबत धक्कादायक कारणं नमूद करण्यात आली आहेत. त्यानुसार पैशांची चणचण, नोकरीमधील अनिश्चितता तसेच घरांची टंचाई या कारणांमुळे बहुतांश लोक कमी मुलांना जन्म देत आहेत.

पैशांच्या चणचणीमुळे मुलांना जन्म देत नसल्याचे भारतातील ३८ टक्के लोकांनी सांगितले आहे. तर २२ टक्के लोकांनी घरांची टंचाई, २१ टक्के लोकांनी नोकरीमधील अनिश्चितता आणि १८ टक्के लोकांनी जोडीदाराचा नकार ही कमी मुलांना जन्म देण्यामागची कारणं असल्याचे सांगितले आहे. एकूणच लोक स्वेच्छेने छोटं कुटुंब निवडत नाहीत तर परिस्थितीमुळे त्यांना कुटुंब छोटं ठेवणं भाग पडत असल्याचं या सर्व्हेमधून दिसत आहे.

यूएनएफपीएच्या इंडिया एजिंग रिपोर्ट २०२३ नुसार भारतामध्ये वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २०५० पर्यंत भारतामध्ये ० ते १४ वयोगटातील मुलांपेक्षा वृद्धांची संख्या अधिक होणार आहे. सध्या भारतातील तरुणांच्या लोकसंख्येकडे एक संपत्ती म्हणून पाहिलं जात आहे. मात्र ही तरुण पिढी आर्थिक चणचण, नोकरीमधील अनिश्चितता आणि चांगल्या आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे जर कुटुंबाची सुरुवात करू शकल्या नाहीत, तर ही संपत्ती ओझं ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच या अहवालानुसार मुलांना जन्म देणं हा केवळ संख्येचा खेळ नाही तर लोकांनी आपल्या इच्छेनुसार निर्णय घेण्याचा हक्क आहे. मात्र भारतामध्ये अनेक महिलांसाठी अजूनही हा हक्क केवळ एक स्वप्नाप्रमाणेच आहे.