पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 14:59 IST2025-05-13T14:50:53+5:302025-05-13T14:59:01+5:30
Modi Visit Adampur Airbase news: पंतप्रधान मोदींच्या या भेटीत या एअरबेसवरील लढाऊ विमान मिग-२९ च नाही तर भारताचे सुरक्षा कवच ठरलेली रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम एस-४०० देखील जगाला दिसली. दिसली नाही तर मुद्दामहून दाखविली गेली.

पाकिस्तानने भारताविरोधात नांगी टाकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सायंकाळी देशवासियांना संबोधित केले. यानंतर सकाळ उजाडताच हवाई दलाच्या आदमपूर एअरबेसला भेट देत निधड्या छातीने लढलेल्या जवानांचे मनोबल उंचावले. मोदींनी या आदमपूरचीच का निवड केली, असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.
पंतप्रधान मोदींच्या या भेटीत या एअरबेसवरील लढाऊ विमान मिग-२९ च नाही तर भारताचे सुरक्षा कवच ठरलेली रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम एस-४०० देखील जगाला दिसली. दिसली नाही तर मुद्दामहून दाखविली गेली. खोट्याची शेखी मिरविणाऱ्या पाकिस्तानची जिरविण्यासाठी.
मोदींचा आदमपूरचा जो व्हिडीओ आला आहे, त्यात या दोन्ही गोष्टी दिसत आहे. एस ४०० ने पाकिस्तानचे ड्रोन हल्लेच नाहीत तर मिसाईल हल्लेही परतवून लावले होते. रशिया तेव्हा भारताच्या मदतीला आला नसता तर कदाचित भारताला या आधुनिक युद्धात लढणे कठीण गेले असते. रशिया हा भारताचा कायमच मित्र देश राहिला आहे, मित्रासाठी वाट्टेल ते म्हणत भारतानेही नेहमी रशियाला त्यांच्या चलनाचा दर कमी असूनही जास्त भाव दिला आहे.
पाकिस्तानने मोदी आज गेलेला हवाई दलाचा तळ उध्वस्त केल्याची शेखी मिरविण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानी लढाऊ दलाचे विमान JF-17 ने आदमपूर एअरबेससह तिथे तैनात असलेली एस ४०० देखील नष्ट केल्याचा दावा केला होता. पाकिस्तानने यासाठी हायपरसोनिक मिसाईलचा वापर केला होता, असा दावा करण्यात आला होता. तो भारताने आज फोल ठरविला आहे. हाच नाही तर पाकिस्तानचे अन्य दावेही फोल ठरले आहेत.
काय होते दावे...
आदमपूरचा रनवे उध्वस्त केल्याचे पाकिस्तानने म्हटले होते, परंतू आज मोदींचे विमान याच रनवेवर उतरले. म्हणजेच रनवे पूर्णपणे ठीक आहे, हा संदेश जगात गेला.
पाकिस्तानने ड्रोनने आदमपूरच्या रडार सिस्टमवर हल्ला केल्याचे म्हटले होते. ही रडार सिस्टीम यानंतरही देशाचे संरक्षण करत होती, करत आहे. म्हणजे हा हल्ला झालाच नाही.
क्षेपणास्त्रांनी भारतीय हवाई दलाचे विमान पाडले असा दावा पाकिस्तानने केला होता. यात या विमानतळावरील तैनात मिग २९ दिसत आहेत.
हवाई दलाचे अनेक जवान मारल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि सर्वजण लष्कराच्या रेकॉर्डवर आहेत. तसेच आज मोदींच्या स्वागतावेळी हे जवान आनंदोत्सव साजरा करत होते.
आदमपूर एअरबेसचे उपग्रह छायाचित्रे दाखविताना पाकिस्तानने त्याला नुकसान झाल्याचे म्हटले होते. तज्ञांनी याची पडताळणी केली तेव्हा त्यात छेडछाड केल्याचे आढळले.
आदमपूर एअरबेस अनेक वर्षांपासून बंद होता, असेही पाकिस्तानने म्हटले होते, परंतू प्रत्यक्षात तिथे तैनात असलेली यंत्रणा पाहता तो एक आघाडीचा एअरबेस असल्याचे जगाने पाहिले आहे.