ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 10:46 IST2025-05-15T10:30:17+5:302025-05-15T10:46:08+5:30
Operation Sindoor early Attack : पाकिस्तानवर १२ मे रोजी हल्ला होणार होता. बुद्ध पौर्णिमेचा दिवस निवडण्यात आला होता. पाकिस्तान पलिकडून आरोळ्या ठोकत होता, भारत आता हल्ला करेल, नंतर करेल असे दावे केले जात होते.

देशात युद्धाच्या मॉक ड्रीलची घोषणा करण्यात आली होती. परंतू त्यापूर्वीच भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला चढविला होता. पाकिस्तानला गाफिल ठेवण्यासाठी मॉक ड्रील ठेवण्यात आले होते, म्हणजे त्यानंतर भारत हल्ला करेल असे वाटावे, असे दावे केले जात होते. परंतू, भारतीय सैन्याने ठरविलेल्या तारखेच्या पाच दिवस आधीच पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले चढविले, यामागे पाकिस्तानातील रॉ एजंटांचा ठोस सिग्नल होता, असे समोर आले आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची तारीख १२ मे ठरली होती. पंतप्रधान मोदी, एनएसए अजित डोवाल आणि सैन्याचे दोन प्रमुख अधिकारी अशा चार जणांनाच याची माहिती होती. २२ एप्रिलला पहलगाम हल्ला झाला आणि २३ एप्रिलला हाय लेव्हल बैठकीत ऑपरेशन सिंदूर ठरल्याचे लष्करातील बड्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दैनिक भास्करने वृत्त दिले आहे.
पाकिस्तानवर १२ मे रोजी हल्ला होणार होता. बुद्ध पौर्णिमेचा दिवस निवडण्यात आला होता. परंतू याच्या पाच दिवस आधीच ६-७ मे च्या रात्रीच ऑपरेशन सिंदूर लाँच करण्यात आले. भारतात आशांतता पसरविणाऱ्या शक्तींना शांत करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला होता. पाकिस्तान पलिकडून आरोळ्या ठोकत होता, भारत आता हल्ला करेल, नंतर करेल असे दावे केले जात होते.
ऑपरेशन सिंदूर हे नाव २३ एप्रिललाच ठरविण्यात आले होते. अरब देशांचा दौरा अर्धवट सोडून मोदी भारतात परतले होते, त्याच सायंकाळी त्यांनी सुरक्षा समितीची कॅबिनेट बैठक घेतली होती. नाव, तारीख, वेळही ठरली होती. सीडीएस अनिल चौहान यांच्यासह सैन्याच्या तिन्ही प्रमुखांना तयारीचा निरोप गेला होता. परंतू कधी कुठे ते सांगितले गेले नव्हते. संरक्षण मंत्र्यांनाही या तारखेची माहिती नव्हती.
६ मे च्या दुपारी काय घडले...
२३ एप्रिलच्या सायंकाळपासून सैन्याची तयारी सुरु झाली होती, जवळपास पूर्णही झाली होती. केव्हाही आदेश येईल आणि पाकिस्तानवर हल्ले करावे लागतील, तेव्हाच पाकिस्तानचे हल्ले देखील परतवून लावावे लागतील, याची तयारी करण्यात आली होती. पहलगाम हल्ल्याला १४ दिवस झाले होते. यामुळे भारत आता हल्ले करणार नाही अशी पाकिस्तानची आणि दहशतवाद्यांची धारणा झाली होती.
यामुळे भारत कारवाई करेल या शक्यतेने पळून गेलेले दहशतवादी पुन्हा त्यांच्या ठिकाणांवर परतू लागले होते. ६ मेच्या दुपारी पाकिस्तानात ऑपरेशनवर असलेल्या रॉ एजंटचा मेसेज आला, दहशतवादी ठिकाणांवर हालचाली वाढल्या आहेत, दहशतवादी परतले आहेत. बस, एवढ्या माहितीच्या आधारावर भारतात हालचाली सुरु झाल्या.
हा मेसेज देणारा एजंट असा तसा कोणी नव्हता. पाकिस्तानात अनेक ऑपरेशन्स यशस्वी करणारा एजंट होता. तरीही भारतीय सैन्याने सॅटेलाईटद्वारे पुष्टी केली. दहशतवादी गोळा झाल्याचे समजताच आता १२ मे पर्यंत वाट न पाहता आजच हल्ला करण्याचे ठरले. पंतप्रधान मोदींकडे डोवाल हा निरोप घेऊन पोहोचले.
सैन्य तयार होते, परंतू हल्ल्याची वेळ गोपनिय ठेवायची होती. यामुळे कोणत्याही पायलटला किंवा स्टाफला अचानक बोलविण्यात आले नाही. शत्रूचे लोकही भारताच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतेय. यामुळे सारे सामान्यपणे सुरु आहे, असे दाखविण्यात आले.
त्या वेळी जे ड्युटीवर होते त्यांचाच वापर करण्यात आला. दहशतवाद्यांची २१ ठिकाणे मार्क केलेली होती, परंतू केवळ ९ ठिकाणांवरच हल्ला करण्यात आला. कारण हा हल्ला रिअल टाईम माहितीवर आधारित होता. केवळ दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करायचे नव्हते तर अधिकाधिक दहशतवाही मारायचे होते. यामुळे जिथे अधिक इनपूट मिळाले तिथेच हल्ले करण्यात आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.