कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:24 IST2025-10-18T14:19:38+5:302025-10-18T14:24:59+5:30
Marriage Without Kundali Matching Banaras Hindu University Research: लग्न करताना कुंडली जुळवली जाते. पण, हल्ली कुंडली न जुळवता लग्न करण्याकडे जास्त कल वाढला आहे. कुंडली न जुळवता लग्न केल्याने काय परिणाम होतात, याबद्दलच बनारस हिंदू विद्यापीठात एक संशोधन करण्यात आले. त्यातील निष्कर्ष झोप उडवणारे आहेत.

लग्न जुळवताना मुलाची आणि मुलीची कुंडली बघितली पाहिजे का, हा अलिकडे वादविवादाचा विषय बनत चालला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रवचनकार अनिरुद्धाचार्य यांनी कुंडली न जुळवता लग्न केल्यास काय घडू शकते याबद्दल एक विधान केले होते. त्यावरून बरंच वादंग माजलं. पण, जे अनिरुद्धाचार्य म्हणाले होते, त्यालाच दुजोरा देणारे निष्कर्ष आता विद्यापीठात प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहेत.
वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांनी एक अभ्यास केला. विवाहबाह्य प्रेमसंबंध, लिव्ह इन रिलेशनशिप आणि वाढता कौटुंबिक हिंसाचार यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढू लागले आहे. याचे प्रमाण का वाढले आहे, याबद्दलच हे संशोधन करण्यात आले.
बनारस हिंदू विद्यापीठातील प्राध्यापकांनी केलेल्या या संशोधनात ३७ टक्के घटस्फोट हे मुलगा आणि मुलीचे कुंडली न जुळवता लग्न केल्यामुळे होत आहे, असे म्हटले आहे. ग्रह दोष असताना सुद्धा त्यांचे लग्न लावले जात आहेत.
कुंडलीमध्ये असलेल्या दोषामुळे मुलगा वा मुलीचे किंवा दोघेही लग्नानंतर विवाहबाह्य प्रेमसंबंध ठेवत आहेत. बनारस हिंदू विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख प्राध्यापक विनय पांडे यांनी केलेल्या या संशोधनात असा दावा केला गेला आहे की, कुंडली न जुळवता लग्न झालेल्या जोडप्यापैकी एक जण विवाहबाह्य संबंध ठेवत आहे आणि जोडीदाराची हत्या करत आहे.
कुंडलीत दोष असताना लग्न लावून दिल्यामुळे दोघांचे काही काळानंतर वाद सुरू होत आहेत. त्यातून नात्यात दुरावा येऊन नव्या साथीदाराला शोधत आहेत. त्यातून विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होत आहेत. त्यातून घटस्फोट, जोडीदाराची हत्या करण्याच्या घटना वाढल्या आहेत, असे या संशोधनात म्हटले आहे.
ज्योतिष विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहा महिने या विषयावर संशोधन आणि अभ्यास केला. ज्योतिष विभागाचे प्रमुख पांडे म्हणाले की, मुलगा आणि मुलगी यांच्या कुंडलीतील ३६ पैकी ३२ गुण जुळले तरी ग्रह जुळणेही आवश्यक आहे.
कमीत कमी १८ गुण जुळणे गरजेचे आहे. पण, लोक स्वतःला मॉर्डन दाखवण्यासाठी धार्मिक परंपरा आणि पद्धती टाळत आहेत. बहुतांश जोडपी लग्नात फक्त फोटोशूट करण्यात व्यस्त असतात. मंत्रोच्चार त्यांना गरजेचे वाटत नाही. त्यामुळेच घटस्फोट होत आहेत. मुलगा किंवा मुलगी आपल्या जोडीदाराच्या हत्या करत आहेत.