Independance Day: हर घर तिरंगा.... ज्यांना घर नाही, त्यांनीही दिमाखात फडकवला झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 12:03 PM2022-08-16T12:03:05+5:302022-08-16T12:24:02+5:30

पालावर राहणाऱ्या, पत्र्याच्या शेडमध्ये जगणाऱ्या, नीटनीटकं छप्पर नसणाऱ्या, फुटपाथवर झोपणाऱ्यांनीही आहे तिथं ध्वज फडकावत हर घर तिरंगा या मोहिमेत सहभाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. नरेंद्र मोदींनी सोमवारी नवव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले आहे. ध्वजारोहण केल्यानंतर नरेंद्र मोदींनी संबोधनाला सुरुवात केली आहे. त्यावेळी, हर घर तिरंगा मोहिमेचाही उल्लेख केला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मी जगभरातील भारतप्रेमींना, भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो, असं मोदींनी सर्वप्रथम सांगितलं. तसेच केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात हा तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचं त्यांनी भाषणात म्हटलं.

भारतीय जनतेतील सामूहिकतेची भावना पुन्हा एकदा जागृत झाली आहे. हर घर तिरंगाच्या माध्यमातून लोकांमध्ये चेतना निर्माण झाली. देशामध्ये किती सामर्थ्य आहे हे तिरंग्याच्या माध्यमातून जगाला समजले आहे.

थाळी, टाळ्या वाजवून देशातील नागरिकांनी कोरोना योद्धांना पाठिंबा दिला. यातून चेतना निर्माण झाल्याचं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. तसेच भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. संपूर्ण जग आता भारताकडे गर्वाने, अपेक्षाने पाहतोय, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांनी घरावर राष्ट्रध्वज फडकावत देशाभिमान दाखवून दिला.

मोदींच्या या अभियानावर अनेकांनी टिकाही केली होती. ज्यांना घरच नाही, त्यांनी कुठं फडकवायचा तिरंगा, असे म्हणत कार्टुन्स व्हायरल झाले होते. तर, विरोधकांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, ज्यांना पक्क घरच नाही, त्यांनी दिमाखात तिरंगा फडकवला.

नातवापासून आजी-आजोबापर्यंत, सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत, शिपायापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी तिरंगा ध्वज फडकावत देशाभिमान दाखवून दिला.

पालावर राहणाऱ्या, पत्र्याच्या शेडमध्ये जगणाऱ्या, नीटनीटकं छप्पर नसणाऱ्या, फुटपाथवर झोपणाऱ्यांनीही आहे तिथं ध्वज फडकावत हर घर तिरंगा या मोहिमेत सहभाग घेतला.

हिंदु-मुस्लीम-शीख-ईसाई यांसह सर्वच धर्माच्या नागरिकांना भारत हाच धर्म तिरंगा हाच राष्ट्रध्वज म्हणत घरावर तिरंगा फडकवल्याचं दिसून आलं. 20 कोटी देशवासीयांच्या घरावर तिरंगा फडकविण्याचं सरकारचं उद्दिष्ट होतं, पण नक्कीच त्याहीपेक्षा जास्त घरावर आणि पक्क घर नसलेल्या घरांवरही तिरंगा डौलाने फडकला असेल.