म्हणे, असा आहे लॉकडाऊनचा 'एक्झिट प्लान'; व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या 'त्या' मेसेजमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 01:09 PM2020-05-10T13:09:50+5:302020-05-10T13:41:33+5:30

देशात सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. हा लॉकडाऊन १७ मेपर्यंत सुरू असणार आहे. लॉकडाऊन सुरू असूनही देशातल्या कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढतोय. त्यामुळे १७ मेनंतर काय होणार, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. त्यामुळे १८ मेनंतरही अशाच प्रकारे काही निर्बंध हटवले जातील, असं अनेकांना वाटतंय. तसा एक मेसेजदेखील सध्या व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झालाय.

पाच टप्प्यांमध्ये देशातला लॉकडाऊन हटवण्यात येईल, असा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. १८ मे, ८ जून, २९ जून, २० जुलै आणि १० ऑगस्ट अशा तारखा मेसेजमध्ये देण्यात आल्या आहेत. दर तीन आठवड्यांनी सरकारकडून हळूहळू निर्बंध शिथील करण्यात येतील, असा दावा केला गेला आहे.

१८ मेपासून बांधकाम क्षेत्र, बगीचे आणि खुल्या जागांवर कर्मचाऱ्यांना कामं सुरू करता येतील. बगीचे, दुरुस्ती आणि हार्डवेअरची दुकानं उघडण्याची शक्यता आहे. फिटनेस आणि क्रीडा उपक्रम (खेळाडूंचे संपर्क येणार नाही असे) सुरू होतील. मात्र यामध्ये ४ पेक्षा अधिक जणांच्या सहभागास परवानगी असेल, असा दावा करण्यात आला आहे.

नागरिकांना त्यांच्या मित्रांना भेटण्याचीदेखील परवानगी दिली जाऊ शकते. मात्र त्यासाठी ४ जणांची असेल. बऱ्याचशा नियमित आरोग्य सेवा सुरू होतील. याशिवाय सार्वजनिक सुविधादेखील सुरू केल्या जाऊ शकतात. समुद्र किनारे आणि डोंगराळ भाग पर्यटनासाठी खुला केला जाण्याची असल्याचं व्हायरल मेसेजमध्ये नमूद करण्यात आलंय.

८ जूनपासून लॉकडाऊन उठवण्याचा दुसरा टप्पा सुरू होईल, असा दावा करण्यात आला आहे. या टप्प्यात सध्या लागू असलेले निर्बंध ५ किलोमीटरवरुन २० किलोमीटरपर्यंत वाढवले जातील. जास्तीत जास्त ४ जणांना दुसऱ्या घरात जाऊन नातेवाईकांची, मित्रांची भेट घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र ही भेट मर्यादित वेळेत घ्यावी लागेल, अशी माहिती व्हायरल मेसेजमध्ये आहे.

अंत्यसंस्कारांवेळी अधिक जणांना एकत्र येण्याची परवानगी असेल. मात्र त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागेल. किरकोळ विक्रेत्यांना कर्मचारी आणि ग्राहकांची संख्या मर्यादित ठेवून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दुकानं सुरू ठेवता येतील. याशिवाय सार्वजनिक वाचनालयंदेखील सुरू होतील, असा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

२९ जूनपासून लॉकडाऊनच्या एक्झिट प्लानचा तिसरा टप्पा सुरू होईल, असा दावा करण्यात येत आहे. या टप्प्यात अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी प्ले-स्कूल्स सुरू होतील. याशिवाय कर्मचाऱ्यांचा एकमेकांशी फारसा संपर्क न येणारी कार्यालयं सुरू केली जातील. अत्यावश्यक वस्तूंची विक्री न करणारी दुकानंदेखील सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून आणि ग्राहकांची संख्या मर्यादित ठेवून सुरू करण्यात येतील. या टप्प्यात रस्त्याच्या शेजारी असणारी, स्वतच: प्रवेशद्वार असलेली दुकानं सुरू होतील. शॉपिंग सेंटरमधील दुकानं या टप्प्यात सुरू होणार नाहीत.

तिसऱ्या टप्प्यात खेळाची मैदानं खुली होतील. इनडोअरमधील खेळदेखील सुरू होतील. याशिवाय कॅफे आणि रेस्टॉरंट्सदेखील सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून उघडण्याची परवानगी देण्यात येईल, असा उल्लेख व्हायरल मेसेजमध्ये आहे.

२० जुलैपासून लॉकडाऊन संपवण्यासाठीचा चौथा टप्पा सुरू करण्यात येईल, असा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. या टप्प्यात तुमच्या परिसराच्या बाहेर प्रवास करण्याची परवानगी असेल. लहान सामाजिक मेळावे घेतला येतील. कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे करण्याची परवानगी असेल.

तिसऱ्या टप्प्यात केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेले प्ले स्कूल्स चौथ्या टप्प्यात सर्व मुलांसाठी सुरू होतील. घरात राहून काम करण्यात अडथळे येत असलेले, समन्वय साधण्यात समस्या येत असलेले कर्मचारी कार्यालयांत सुरू जाऊ शकतात. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी त्यांच्या कामाच्या वेळांमध्ये बदल करण्यात येईल.

चौथ्या टप्प्यात केशकर्तनालयं, संग्रहालयं, सांस्कृतिक केंद्रं सुरू होतील. याशिवाय क्रीडा संघ खेळण्यास सुरुवात करू शकतात. सार्वजनिक जलतरण तलावदेखील सुरू करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. ग्राहकांची संख्या मर्यादित ठेवून हॉटेल उघडण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र हॉटेल बार बंदच राहतील, असा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

१० ऑगस्टपासून लॉकडाऊन एक्झिटचा पाचवा टप्पा सुरू होईल, असं मेसेजमध्ये म्हटलं गेलं आहे. या टप्प्यात सामाजिक कार्यक्रमांना परवानगी असेल. मात्र मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करता येणार नाही. शाळा आणि महाविद्यालयं टप्प्याटप्प्यानं सुरू होतील. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळू न शकणाऱ्या कार्यालयांशिवाय इतर सर्व कार्यालयं सुरू होतील.

पाचव्या टप्प्यात शॉपिंग सेंटर्स, टॅटू पार्लर्स, चित्रपटगृहं सुरू करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. याच टप्प्यात रग्बी, बॉक्सिंगसारख्या खेळांनादेखील परवानगी दिली जाऊ शकते. व्यायामशाळा आणि नृत्य केंद्रं सुरू करण्याची मुभा दिली जाण्याची शक्यता आहे. खेळांच्या मोठ्या स्पर्धादेखील सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

सण आणि सांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात, पण मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत साजरे केले जाऊ शकतात. पर्यटक बेटांवरील किनाऱ्यांना भेटी देऊ शकतात, असा दावादेखील मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमध्ये बाहेर पडण्यासाठी सरकारनं पाच टप्पे आखले आहेत. सरकारचा एक्झिट प्लान तयार असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा मेसेज व्हॉट्स अॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हायरल मेसेजनुसार लॉकडाऊन हटवण्याचा पहिला टप्पा १८ मेपासून सुरू होईल. लोकमत डॉट कॉमनं याबद्दलची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. त्यात लॉकडाऊन हटवण्याचा हा संपूर्ण प्लान आर्यलंड सरकारचा असल्याची माहिती मिळाली. आर्यलंड सरकारच्या संकेतस्थळावर लॉकडाऊन हटवण्याचे पाच टप्पे देण्यात आले आहेत. १ मे २०२० रोजी ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या टप्प्यांचा, या एक्झिट प्लानचा भारतातील लॉकडाऊनशी कोणताही संबंध नाही.