CoronaVirus Updates: दिलासादायक! देशभरात सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 11:12 AM2021-06-18T11:12:52+5:302021-06-18T11:22:31+5:30

CoronaVirus Updates: नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात ६२ हजार ४८० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. एका दिवसात १ हजार ५८७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. विशेष म्हणजे सक्रिय रुग्णसंख्या ७३ दिवसांनी ८ लाखांच्या खाली आली आहे.

गेल्या २४ तासात भारतात ६२ हजार ४८० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ५८७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. तर दिवसभरात देशात ८८ हजार ९७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २ कोटी ९७ लाख ६२ हजार ७९३ वर गेला आहे. देशात २ कोटी ८५ लाख ८० हजार ६४७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ४९० रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ७ लाख ९८ हजार ६५६ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २६ कोटी ८९ लाख ६० हजार ३९९ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यात गुरुवारी ९,८३० नवे कोरोना रुग्ण, तर २३६ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५९ लाख ४४ हजार ७१० झाली असून, मृतांचा आकडा एक लाख १६ हजार २६ झाला आहे. सध्या एक लाख ३९ हजार ९६० रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात दिवसभरात ५,८९० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ५६ लाख ८५ हजार ६३६ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४ टक्के आहे. आजपर्यंत तपासलेल्या तीन कोटी ८८ लाख ५७ हजार ६४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आहेत. राज्यात आठ लाख ५० हजार ६६३ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत, तर चार लाख ९६४ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत. राज्यात पुण्यात १८ हजार ८८७, मुंबईत १८ हजार ४१७, कोल्हापूर १३ हजार ४८५, ठाणे १४ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात दिवसभरात दोन लाख ३४ हजार ३५८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे; तर आतापर्यंत २ कोटी ६७ लाख २० हजार १७ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील २६ लाख ९४ हजार ७३० लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस २ लाख ११ हजार ४०९ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.