Coronavirus: MP मधलं एक असं गाव! ज्याठिकाणी आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 09:38 PM2021-04-28T21:38:30+5:302021-04-28T21:42:23+5:30

Coronavirus: संपूर्ण देशभरात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून आजही अनेक गाव जनजागृतीमुळे कोरोनापासून सुरक्षित आहेत.

संपूर्ण देशात कोरोना महामारीची दुसरी लाट पसरली आहे. सगळीकडे हाहाकार माजला आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत तर कुठे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचे जीव जात असल्याने लोक चिंतेत आहेत.

लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात एक महत्त्वाची बातमी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मध्य प्रदेशातील आगर मालवा येथे सर्वसामान्य लोकांच्या जागरूकतेमुळे संपूर्ण गावात एकही कोरोना संक्रमित रुग्ण आढळला नाही.

गेल्या वर्षी कोरोनाने भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात त्याचा प्रभाव दाखवला होता. जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन केले होते. भारतानेही कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केले. परंतु काही काळात यात सूट दिल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेने डोकेदुखी वाढवली आहे.

देशात एकीकडे आरोग्य यंत्रणा कोलमडली असताना लोकांमध्ये जगजागृती होणं अत्यंत गरजेचे आहे. आगर मालवा येथे निम्म्याहून अशी गावं आहेत ज्याठिकाणी लोकांच्या जनजागृतीमुळे गावात एकही कोरोना संक्रमित रुग्ण आढळला नाही.

आगरा मालवा येथे लोकांच्या जागरुकतेमुळे त्याचा परिणाम असा झाला की, कोरोनाच्य पहिल्या दिवसापासून आजतागायत या गावांमध्ये कोरोना संक्रमित रुग्ण आढळला नाही. यामागे गावांचा दृढ निश्चय आणि प्रचंड इच्छाशक्ती असल्याने गावकरी कोरोना महामारीतही सुरक्षित राहिले.

गावातील महिला आपापल्या घरी सॅनिटायझर, पाणीच्या बॉटल्स आणि साबण ठेवतात. जर कुटुंबातील कोणीही व्यक्ती गावातून आला, शेतातून आला तर त्याला पहिल्यांदा घराबाहेर साबणाने हात आणि पाय धुवायला लावलं जातं. त्यानंतरच घरात प्रवेश मिळतो.

या जनजागृतीमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. महिलांनी घेतलेल्या जबाबदारीमुळे गावात स्वच्छता आणि सॅनिटायझरचं महत्व वाढलं आहे. आगरा मालवा येथील अनेक गावांमध्ये बहुतांश असेच चित्र पाहायला मिळत आहे.

गावातील व्यवस्था पाहिली तर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावातील तरुणांनी एक पथक बनवलं आहे. हे पथक गावात कोणीही प्रवेश करो, मग तो या गावचा असो किंवा बाहेरचा सर्वांची तपासणी करतं. गावात प्रवेश करणारा व्यक्ती कोण आहे. त्याची तब्येत कशी आहे, कुठून आला आहे ही सगळी चौकशी केली जाते.

या पथकाच्या चौकशीनंतर त्या व्यक्तीचे हात सॅनिटायझ केले जातात. त्यानंतर त्याला गावात प्रवेश मिळतो. कोणी बाहेरील व्यक्ती गावात प्रवेश करू नये यासाठी गावातील रस्त्यावर बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. याठिकाणी तरूण ड्युटीवर असतात. गावातील प्रत्येकी २ तरूण ४ तास काम करतात आणि गावाचं संरक्षण करतात.

गावकऱ्यांच्या या जनजागृतीबाबत अधिकाऱ्यांनीही भरभरून कौतुक केले आहे. या गावातील फक्त वयस्कर माणसंच नाही तर लहान मुलंही जागरूकतेत पुढाकार घेतात. या महामारीशी लढायचं असेल तर काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील या जागरुकतेमुळे या गावात कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत एकही व्यक्ती कोरोना संक्रमित झाला नाही.

Read in English