CoronaVirus News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! सोपा नसणार रेल्वेप्रवास, 'या' गोष्टी जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 01:38 PM2020-05-11T13:38:16+5:302020-05-11T14:00:06+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: रेल्वेने प्रवास करणार असाल तर काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कारण लॉकडाऊनदरम्यानचा हा प्रवास सोपा नसणार आहे. कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊया.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान भारतीय रेल्वेने 12 मेपासून पुन्हा प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरुवातीला 15 रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेच्या केवळ 15 जोड्याच (30 फेऱ्या) धावणार असल्याची अशी माहिती रेल्वे विभागाने रविवारी एका निवेदनाद्वारे दिली.

नवी दिल्ली स्थानकातून दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू तावीला जोडणाऱ्या या रेल्वे असतील.

रेल्वेने प्रवास करणार असाल तर काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कारण लॉकडाऊनदरम्यानचा हा प्रवास सोपा नसणार आहे. कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊया.

रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला सोमवारी (11 मे) सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. महत्वाचे म्हणजे, केवळ IRCTCच्या वेबसाईटवरूनच या गाड्यांचे तिकीट बूक करता येईल.

रेल्वेने प्रवास करताना सर्व प्रवाशांना मास्क वापरणं अनिवार्य आहे. मास्क नसलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. तोंड झाकण्यासाठी रुमाल आणि स्कार्फचा वापर करता येईल.

प्रवास करण्याआधी जवळपास एक किंवा दोन तास लवकर रेल्वे स्टेशनवर पोहचणं गरजेचं आहे. प्रवाशांचं स्क्रिनिंग केलं जाणार आहे. निर्गमनाच्या (डिपार्चर) ठिकाणी स्क्रिनिंग करून घेणे बंधनकारक आहे.

कोरोनाची लक्षण असणाऱ्या नागरिकांना प्रवासाची परवानगी नाही. थोडासा जरी ताप असेल किंवा तब्येत बरी नसेल तर तिकीट बूक करू नका.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करणं अनिवार्य आहे. याशिवाय बोर्डिंग मिळणार नाही.

रेल्वे स्थानकांवरील तिकीट बुकिंग काउंटर बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना या गाड्यांसाठी स्थानकांवरील तिकीट बुकिंग काउंटर्सवरून तिकीट मिळणार नाही.

ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकीट आहेत, त्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच रेल्वेने प्रवास करू शकतात.

स्पेशल ट्रेन या देण्यात आलेल्या स्टॉपव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी प्रवाशांसाठी थांबणार नाहीत.

सर्व स्पेशल ट्रेन या एसी कोचसह चालवण्यात येणार आहेत. या ट्रेनमध्ये कोणाही डबा हा जनरल असणार नाही.

रेल्वे आणखी काही मार्गांवरही विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. मात्र, हे उपलब्ध कोचेसवर अवलंबून आहे. कारण 20,000 कोचेस, कोरोना केअर सेंटर म्हणून रिझर्व आहेत.

'श्रमिक स्पेशल'च्या रुपात रोज 300 रेल्वे गाड्या चालवण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर कोचेस रिझर्व आहेत, असेही रेल्वे विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.