दिल्लीत ८ जागांवर भाजपा उमेदवार फक्त १०० मतांनी हरले?; जाणून घ्या या मागचं सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 09:25 PM2020-02-12T21:25:32+5:302020-02-12T21:31:33+5:30

दिल्ली विधानसभेचे निकाल लागल्यापासून सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल होत आहे. यामध्ये सांगण्यात येत आहे की, भाजपा ८ जागा अशा आहेत त्याठिकाणी फक्त १०० मतांच्या फरकाने भाजपा उमेदवाराचा पराभव झाला. तर १९ जागा १००० मतांचा फरक आणि ९ जागांवर २ हजारांच्या फरकाने पराभव झाला आहे.

या मॅसेजमध्ये असा दावाही केला आहे दिल्लीत फक्त ३ आणखी मतदान वाढलं असतं तर स्थिती वेगळी असती. जर असं झालं असतं तर भाजपाची सत्ता आली असती आणि त्यांनी ४४ जागा जिंकल्या असत्या.

या मॅसेजबाबत सत्यता पडताळली असता हा दावा खोटा असल्याचं समोर येतं. फक्त २ जागा अशा आहेत ज्याठिकाणी भाजपा २ हजारांच्या पेक्षा कमी मताने पराभूत झाली आहे. उर्वरीत जागांवरील फरक मोठा आहे.

गूगलवर याबाबत Delhi Election Margin सर्च केलं असता, एका इंग्लिश दैनिकाने दिलेल्या रिपोर्टनुसार १३ ठिकाणी भाजपाचे उमेदवार ७ हजारांपेक्षा कमी मताने पराभूत झाले आहेत. त्यात १३ पैकी २ मतदारसंघात २ हजारांपेक्षा कमी फरकाने भाजपाचा पराभव झाला आहे.

बिजवासन येथे भाजपाचे सतप्रकाश राणा यांना आपच्या भूपिंदर सिंह यांनी पराभूत केले आहे. याठिकाणी फक्त ७५३ मतांनी भाजपा उमेदवाराचा पराभव झाला आहे. तर आदर्शनगर येथे आपच्या पवन शर्मा यांनी भाजपाच्या राज कुमार भाटियांचा पराभव केला. तिथे १ हजार ५८९ मतांनी भाजपाचा पराभव झाला आहे.

याबाबतची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरही तपासण्यात आली. तेव्हा ही आकडेवारी सत्य असल्याचं समोर आलं. त्यामुळे भाजपा संदर्भात जो मॅसेज व्हायरल होत आहे त्यात कोणतंही तथ्य नाही. मॅसेजमध्ये करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं आढळून येतं.