महाआघाडीच्या नेत्यांवर भरबैठकीत नितीश कुणार भडकले, आमदारांना दिला थेट इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 07:12 PM2023-07-10T19:12:17+5:302023-07-10T19:24:22+5:30

यावेळी नितीश कुमार यांनी महाआघाडीतील सर्वच नेत्यांना थेट इशारा दिला आहे...

आगामी लोकसभे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, महाआघाडीतील काही नेत्यांमुळे ते भरसभेत भडकल्याचे बघायला मिळाले. यावेळी त्यांनी महाआघाडीतील सर्वच नेत्यांना थेट इशारा दिला.

महाआघाडीच्या बैठकीदरम्यान सर्व विरोधी पक्षांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा रागाला सामोरे जावे लागले. बैठकीदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडी एमएलसी सुनील सिंह यांना रागाच्या भरात, फार बोलू नका, असे म्हणत फटकारले. यावेळी नितीश कुमार यांनी काँग्रेस नेते अजित शर्मा आणि इतर आमदारांनाही सल्ला दिला.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अजित शर्मा यांना भाजपशी असलेल्या संबंधांवरून फटकारले. तसेच, आमदारांनाही काही समस्या असल्यास आपल्या नेत्याची भेट घ्या, असे सांगितले आहे. बिहार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात बोलावण्यात आलेल्या सत्ताधारी महाआघाडीच्या बैठकीत हा प्रकार घडला.

नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आरजेडी, जेडीयू, काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे आमदार आणि एमएलसी सहभागी झाले होते. या बैठकीदरम्यान सीएम नितीश यांनी आरजेडी एमएलसी सुनील सिंह यांना फटकराले.

या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री विजय चौधरी म्हणाले, अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी काही समस्या असेल तर थेट आपल्या नेत्यांसोबत संपर्क साधा, यामुळे महाआघाडीही मजबूत होईल, अशा सूचना आमदारांना करण्यात आल्या आहेत.

बिहारमधील राजकीय वातावरण तापलेले आहे. यातच जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लालन सिंह यांनी बिहारमध्ये महाआघाडी एकजूट असल्याचे म्हटले आहे. तसेच, भाजपवर निशाणा साधत लालन सिंह म्हणाले, कितीही प्रयत्न करा, पण बिहारमध्ये महाआघाडी एकजूट आणि मजबूत आहे.

भाजपवर हल्ला चढवताना ललन सिंह म्हणाले, हा पक्ष रोजच्या रोज प्रचार-प्रसार करत असतो आणि महाआघाडीत फूट पडली आहे असे म्हणत असतो.