एनडीएतील 25 पक्षांचा एकही खासदार नाही, दुसरीकडे बलाढ्य INDIA शी लढायचेय? मोदी जिंकू शकतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 06:38 PM2023-07-19T18:38:41+5:302023-07-19T18:47:46+5:30

लोकसभा निवडणुकीला आता फार कमी काळ शिल्लक राहिला आहे. जवळपास ९ महिनेच उरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या जिवावर तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची तयारी करत आहेत. तर आतापर्यंत दाहीदिशांना २५ तोंडे असलेले विरोधी पक्ष एकीचे बळ दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच देशात चर्चा सुरु झालीय ती विरोधक मोदींना म्हणजेच एनडीएला हरवू शकतात का? कारण त्यांच्याकडे बाहुबली नेते आहेत व बहुतांश राज्ये देखील आहेत. पण आकडे काही वेगळेच सांगत आहेत. पहा लोकसभेचे बेरीज-वजाबाकीचे राजकारण काय आहे...

एनडीएमध्ये सर्व पक्ष एकदिलाने एकत्र आहेत. परंतू, विरोधक आजही आपापसातील मतभेद, इगो, वर्चस्व, विरुद्ध विचारधारा आदींनी त्रस्त आहेत. ते एकत्र येण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. यातच एखादी जरी का माशी शिंकली तरी विरोधकांच्या एकीची बेकी व्हायला वेळ लागणार नाही. जागा वाटपावरून यामध्ये मोठी फूट होण्याची भाजपा वाट पाहत आहे.

मोदीविरोधी मतांचे विभाजन रोखण्यासाठी हे एकत्र येत आहेत. याद्वारे ते मोदींना विरोधी एकच उमेदवार कमीतकमी ४५० मतदारसंघांत देण्याचा प्रयत्न करणार आहेत. लोकसभेला ५४३ जागा आहेत. या प्लॅनला मूर्त रुप देण्यासाठी ११ सदस्यांची एक समिती बनविली जाणार आहे. आता जमिनीवरील आकडेवारी पाहुयात...

विरोधकांना धडकी भरवण्यासाठी भाजपा एनडीएचा विस्तार करत आहे. यामुळे आधी एनडीए सोडून गेलेल्या शिवसेना, अकाली दल बिहारमधील पासवान यांचा पक्ष मोदींनी पुन्हा जोडला आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही सुरुंग लावला आहे. यामुळे महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी बहुतांश जागा भाजपाकडे येण्यासाठी प्रयत्न आहे.

मात्र, एनडीएत एक मोठी गोम आहे. एनडीएमध्ये छोटे छोटे पक्ष आहेत. कालच्या बैठकीला ३९ पक्ष आले होते. यापैकी २५ पक्षांचा एकही खासदार नाहीय. दुसरीकडे विरोधकांकडे २६ पक्ष आले होते. त्यांच्यापैकी १० पक्षांकडे खासदार नाहीय. या दोन्ही आघाडी-युतीकडे लक्ष टाकले तर विरोधकांकडे ममता, नितीश, लालू, केजरीवाल, अखिलेश, शरद पवार, उद्धव ठाकरेंसारखे मोठे नेते आहेत. हे नेते कागदांवर जरी मोठे दिसत असले तरी जमिनीवरील आकडे काही वेगळेच सांगत आहेत.

लोकसभेत भाजपचे २२४ खासदार असे आहेत ज्यांनी गेल्या निवडणुकीत ५० टक्के किंवा त्याहून अधिक मते मिळविली होती. 2019 मध्ये भाजपने केवळ 436 जागा लढवल्या होत्या. म्हणजे ५० टक्क्यांहून अधिक मते मिळणारे भाजपाकडे एकूण जागांच्या निम्मे मतदारसंघ आहेत. इथेच या खासदार नसलेल्या २५ पक्षांचा खरा खेळ सुरु होतो. भाजपा आणि त्यांच्या मदतीने ही मते एनडीएला मिळत आहेत.

५० टक्क्यांहून अधिक मते मिळणाऱ्या जागा य़ा गुजरातमधील सर्व 26, दिल्लीतील सर्व 7, मध्य प्रदेशातील 25, राजस्थानमधील 23, यूपीमधील 40, कर्नाटकातील 20, बिहारमधील 14 आणि हरियाणातील 9, छत्तीसगडमधील 6, उत्तराखंडमधील 5, हिमाचलमधील 6 जागा आहेत. 8 जागांवर भाजपचे उमेदवार 70 टक्क्यांहून अधिक मते मिळवून विजयी झाले आहेत.

त्यापैकी 120 जागा अशा होत्या, जिथे काँग्रेसची थेट लढत होती. या जागा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांच्या होत्या. आता काहीसे राजकारण बदलले आहे. महाराष्ट्रात भाजपाने दोन पक्ष फोडले आहेत. कर्नाटकात भाजपच्या हातून सत्ता गेली आहे. बिहारमध्ये नितीशकुमार वेगळे झाले आहेत. दक्षिणेत भाजपाला काही शिरकाव करता आलेला नाहीय. यामुळे भाजपाला उत्तरेकडील राज्यांमध्येच ताकद लावाली लागणार आहे.

निदान हे आकडे पाहता 2024 मध्ये विरोधकांचा I.N.D.I.A. सर करण्याचा मार्ग दिसतो तेवढा सोपा नाहीय. तसेच मायावती, के. चंद्रशेखर राव, नवीन पटनायक आणि जगन मोहन रेड्डी, चंद्राबाबू नायडू आणि एचडी देवेगौडा यांसारख्या दिग्गजांच्या पक्षांचा विरोधकांच्या गटात समावेश नाहीय. यामुळे काही राज्यांत तिहेरी लढत देखील होणार आहेत. याचा फायदा विरोधकांपेक्षा भाजपालाच जास्त होण्याची शक्यता आहे.