वेळेआधीच होणार २०२४ लोकसभा निवडणूक, पण..; फक्त ५ पाँईंटमध्ये वाचा भाजपाचा संपूर्ण प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:12 PM2023-08-29T17:12:35+5:302023-08-29T17:17:10+5:30

लोकसभा निवडणुका मे महिन्यात नसून डिसेंबरमध्ये होणार असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आधीच हेलिकॉप्टर बुक केले आहेत. I.N.D.I.A. विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या नितीश कुमार यांच्यासह अन्य नेत्यांचा असा दावा आहे की नरेंद्र मोदी २०२४ च्या लोकसभा निवडणुका वेळापत्रकाच्या आधी घेण्याची शिफारस करू शकतात.

याशिवाय लोकसभा निवडणूक जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणार असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. विरोधी नेत्यांच्या दाव्यांमध्ये आणि राजकीय कुजबुज यात संकेतही मिळतात. मात्र नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा याबाबत पुढचे पत्ते उघडणार आहे. नोव्हेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

२०१४ मध्ये मोदी लाटेमुळे भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेवर आला. २०१९ मध्येही मोदी जादूने काम केले आणि नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. या दोन्ही निवडणुका एप्रिल-मे महिन्यात झाल्या होत्या. २००४ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता.

२००४ च्या कडक उन्हात १३ मे रोजी निवडणुकीचे निकाल आले आणि इंडिया शायनिंगचा नारा देणारा एनडीए १० वर्षे सत्तेबाहेर होता. भाजप ही चूक पुन्हा करेल अशी आशा कमी आहे. तेव्हापासून देशात सार्वत्रिक निवडणुका उन्हाळ्यात होत आहेत. सार्वत्रिक निवडणुका लवकर होण्याची शक्यता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि नितीशकुमार यांनी व्यक्त केली.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणुकांचे संकेत दिल्याने या विरोधी नेत्यांच्या दाव्याला पुष्टी मिळते. पण ममता बॅनर्जींनी दावा केल्याप्रमाणे डिसेंबर आणि जानेवारी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार नाहीत हे निश्चित आहे.

१) भाजपाचे केंद्रीय नेतृत्व लोकसभा निवडणुका आधी घेण्याबाबत गंभीर असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू आहे. पण त्याआधी मोदी २.० चे सरकार अनेक मोठे निर्णय घेणार आहे. सरकार आपल्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्पही फेब्रुवारीमध्ये सादर करणार आहे. अर्थसंकल्पातील जनतेला मोठमोठी आश्वासने देण्याची संधी भाजपा सोडणार नाही.

२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून मध्यमवर्गीयांसाठी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी अर्थसंकल्पातच होऊ शकते. याशिवाय महिलांसाठी जाहीर केलेल्या योजना अर्थसंकल्पातूनच पूर्ण होऊ शकतात. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीपासून सुरू होऊन एप्रिलपर्यंत चालते. सरकारने त्याचा कालावधी कमी केला तरी, नियमित कामकाज पूर्ण करण्यासाठी सभागृहाचे कामकाज फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील.

३) समान नागरी कायद्याबाबत भाजपा आणि पंतप्रधानही अनेकदा बोलले आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपा समान नागरी संहिता विधेयक आणण्याचा डाव खेळू शखते. भाजपाची ही खेळी विरोधी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना अवघड जाऊ शकते. याला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या सर्व नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उत्तर द्यावे लागेल.

४) जानेवारी २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्याची शक्यता आहे. भाजपाने तीन दशकांपासून राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. निवडणुकीच्या काळात इतकी मोठी संधी गमावणे भाजपा सोडणार नाही. यूपीसह देशभरातील लोक राममंदिर बनण्याची वाट पाहत आहेत. नियोजित वेळेपूर्वी निवडणुका झाल्या तर त्याचा फायदा भाजपला मिळणार नाही.

५) मार्च महिना प्रचार आणि निवडणूक दौऱ्यासाठी अनुकूल आहे. सर्व पक्षांना हवामानाचा फायदा होईल. मात्र राममंदिर आणि अर्थसंकल्पानंतर सरकार निवडणुकीत उतरले तर भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. नितीशकुमार आणि ममता बॅनर्जी यांच्या दाव्यात जोर आहे. पण निवडणुका आधी झाल्या तरी त्या फेब्रुवारी आणि मार्चमध्येच होतील. जेव्हा नैसर्गिक हवामान सौम्य आणि राजकारण तापलेले असेल.