भारताची चिंता वाढवणारी घटना! २० भारतीयांचे मृतदेह घेऊन कुवेतहून केरळला पोहचलं विमान, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:02 IST2026-04-01T13:56:59+5:302026-04-01T14:02:08+5:30

कुवेतमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये प्राण गमावलेल्या २० भारतीय नागरिकांचे मृतदेह बुधवारी केरळच्या कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. आखाती प्रदेशातील सध्याच्या तणावामुळे हे मृतदेह भारतात परत आणण्यास विलंब झाला असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

या मृतांमध्ये तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील मुथुकुलथूर येथील रहिवासी असलेल्या ३७ वर्षीय संथनसेल्वम कृष्णन यांचा समावेश आहे, जे कुवेतमधील एका जलशुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मरण पावले.

उर्वरित १९ भारतीय नागरिकांचा मृत्यू विविध अपघातांमध्ये आणि नैसर्गिक कारणांमुळे झाला परंतु इराणने आखाती देशांवर केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेमुळे त्यांचे मृतदेह भारतात परत आणण्यास विलंब झाला.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाला दुसरा महिना सुरू झाला असून आतापर्यंत एकूण आठ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे.

भारतीयांचे मृतदेह लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबीयांना परत मिळावेत यासाठी कुवेतमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयातील आखाती देशांच्या घडामोडींचे पर्यवेक्षण करणारे सहसचिव असीम महाजन यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुःखद घटना आहे. आम्ही शोकाकुल कुटुंबाप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो. भारतीय दूतावास कुटुंबाच्या संपर्कात असून सर्वतोपरी मदत सुनिश्चित करत आहे असं असीम महाजन यांनी सांगितले.

कुवेत येथील भारतीय दूतावासानेही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात दूतावासाने म्हटले आहे की, खारपाणी शुद्धीकरण प्रकल्पावरील हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचे निधन झाल्याबद्दल आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने सर्वतोपरी मदत करत आहोत असं त्यांनी सांगितले.

कुवेतच्या विद्युत, जल आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानेही याची माहिती दिली. रविवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्यात एका मोठ्या वीज आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले असून त्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.

आखाती प्रदेशातील वाढत्या तणावाचा परिणाम सामान्य नागरिकांवरही होत आहे. भारतीय नागरिकांचे मृत्यू आणि बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरवत आहेत.

















