Maharashtra Political Crisis: युवासेनेतून ३५ राजीनामे! वरुण सरदेसाईंनी चक्र फिरवली; शिंदे गटाकडे गेलेले ‘मातोश्री’वर परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 11:39 AM2022-08-12T11:39:22+5:302022-08-12T11:43:48+5:30

Maharashtra Political Crisis: ही बंडखोरी आदित्य ठाकरेंसाठी मोठाच धक्का ठरला असता. मात्र, वरुण सरदेसाईंनी सर्व चक्र फिरवली आणि शिंदे गटाचाच करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत.

निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातून शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. युवासेनेतीलही अनेकांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. मात्र, यातच आता आपापल्या पदाचा राजीनामा देऊन शिंदे गटाची वाट धरलेल्या ३५ पदाधिकाऱ्यांचे मनपरिवर्तन करण्यात यश आल्याची माहिती देण्यात आली. राजीनाम्याचे वृत्त कळताच युवासेनेचे वरुण सरदेसाई (Varun Sardesai) कामाला लागले. चक्र वेगाने फिरली आणि शिंदे गटाकडे वळलेली पावले ‘मातोश्री’वर परतल्याचे म्हटले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यावेळी नांदेड जिल्ह्यातील युवासेनेच्या तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठवले होते. हे राजीनामे केवळ नाराजीतून देण्यात आले होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची नाराजी आणि गैरसमज दूर करत युवासेना प्रदेश सहसचिव माधव पावडे यांनी यशस्वी मध्यस्थी केली आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांची पदाधिकाऱ्यांशी भेट घडवून आणली.

वरुण सरदेसाई यांनी कोणाचेही पद काढले जाणार नाही. तुम्ही कामाला लागा. निश्चितपणे युवासेना आगामी काळात महत्त्वाची भूमिका पार पाडेल असा विश्वास दिल्यानंतर युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्य संपले. शिवसेनेत बंड झाल्यानंतर अनेक नाट्यमय घटना घडामोडी घडल्या आहेत.

याच दरम्यान युवासेनेतील तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे सामूहिक राजीनामे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठवले होते. युवा सेनेच्या या राजीनाम्याची माध्यमे आणि युवासेनेने गांभीर्याने दाखल घेतली. नांदेड जिल्ह्यातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर ते शिंदे गटात सहभागी होतील, अशी चर्चा होती.

किंबहुना शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी या सैनिकांना शिंदे गटात ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वार्थी आणि गद्दार राजकारण्यांचे मनसुबे उधळून लावत युवासेनेचे सहसचिव माधव पावडे यांनी ३५ ही युवा सैनिकांची नाराजी ऐकून घेतली. युवासेनेत काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेतल्या.

यापुढे युवा सेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास देत त्यांना थेट शिवसेना भवन मुंबई येथे घेऊन जाऊन युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई, सुरज चव्हाण ,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांची भेट घालून दिली. या भेटीत वरूण सरदेसाई यांनी नांदेडच्या युवा सैनिकांचे सगळे म्हणणे ऐकून घेतले.

तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, युवा सेना तुमच्या कार्याची निश्चितपणे दखल घेईल, येणारा काळ आपला असेल, त्यामुळे कोणतेही नाराजीनाट्य ठेवू नका, तन मन धनाने कामाला लागा, युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेना उभी करावयाची आहे, मातोश्री बळकट करायची आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हात अधिक बळकट करावयाचे आहेत.

या राज्यात पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी हेवेदावे आणि गैरसमज दूर करून जोमाने कामाला लागा. युवासेना, आदित्य ठाकरे आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास देत आपल्या काही अडचणी असतील तर माधव पावडे यांच्या माध्यमातून मला सांगा, मी त्या निश्चितपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करीन, असा शब्दही वरूण सरदेसाई यांनी दिला.

युवा सैनिकांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर झाली असून त्यांनी दिलेले सर्व राजीनामे वरूण सरदेशाई यांनी नामंजूर केले आहेत. या भेटीत माधव पावडे, युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी शिंदे, माजी जिल्हाप्रमुख महेश खेडकर यांच्यासह उपजिल्हाप्रमुख संतोष पावडे, बळवंत तेलंग, अभिजीत भालके, रवी नागरगोजे, महेश जाकापुरे, ऋषी पाटील वानखेडे, एकनाथ मोगरकर यांच्यासह युवा सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.