समजा अचानक समोर बिबट्या आलाच तर काय कराल? अशी घ्या खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:30 IST2025-11-18T14:14:08+5:302025-11-18T14:30:25+5:30
सध्या राज्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याने लोकवस्तीत हल्ले केल्याचे समोर आले आहे. यामध्ये दोन लहान मुलींचा मृत्यू झाला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये बिबट्यांचे दर्शन होत आहे. अनेक ठिकाणी बिबट्यांनी लोकांवर हल्लेही केले आहेत. पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि सह्याद्रीच्या कडेला बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने अनेक ठिकाणी पिंजरे लावले असून बिबट्यांना पकडण्याचे काम सुरू आहे.

बिबट्या दिसला, बिबट्याने जनावरांवर हल्ले केले अशा बातम्या दररोज आपल्या वाचनात येत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी बिबट्यांमुळे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी बिबट्यापासून वाचण्यासाठी कशी काळजी घ्यावी, याबत आपण जाणून घेऊया.

अचानक तुमच्या समोर बिबट्या आला तर सगळ्यात पहिल्यांदा आहेत त्या जागेवर स्थिर उभे राहावे. त्याच्याकडे सावधरीतीने बघा.

त्याच्या जवळ जाऊ नका, बिबट्या स्वतःच रक्षण करण्यासाठी अटॅक करू शकतो. जागेवर स्थिर आणि सावध असालतर बिबट्या लगेच अटॅक करत नाही. आपल्या शरीराची जास्त हालचाल करु नका.

बिबट्या गुरगुर आवाज करून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल,मात्र तुम्ही एका जागेवर शांत आणि सावध उभे राहा.

बिबट्यापासून वाचण्यासाठी काही उपाययोजना करायला हव्यात. आपल्या घरापासून 20 ते 25 फूट अंतरावर पिकांची लागवड करणे. शेतात,घराजवळ पुरेसा उजेड ठेवणे. घराला जितकं मोठ कंपाऊंड करता येईल तितकं करणे.

घराच्या बाहेर पाळीव कुत्रे बांधून न ठेवणे, कुत्र्याच्या वासाने बिबट्या घराकडे येतो. मोकळे कुत्रे प्रतिकार करू शकतात. मात्र, बांधलेले कुत्रे प्रतिकार करत नाही. त्याला शिकार करणे सहज सोपे होते. जनावरे गोठ्यात बंधिस्त ठेवावी.

लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी. शेतात लहान मुलांना घेऊन जाऊ नये. बाहेर जाताना हातात काठी ठेवावी. काठीला घुंगरू बांधावे. जेणेकरून बिबट्या पळून जाऊ शकतो

वन्यजीव रक्षक काय सांगतात बिबट्याच आवडत खाणे म्हणजे कुत्रे आणि कुत्रे हे मानवीवस्ती जवळ जास्त असतात. त्यामुळेच बिबट्याचा वावर त्या परिसरात अधिक वाढतो. मात्र, बिबट्या जर मानवी वस्तीत शिरला तर नागरिक त्याला बघण्यासाठी गर्दी करतात आणि त्यामुळे देखील तो हल्ला करू शकतो.
















