भारत आणि बांगलादेशमध्ये आता कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. बांगलादेशमध्ये मुस्लिम लोक हिंदूंना टार्गेट करत आहेत. गेल्या 18 दिवसांत सहा हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. याचा परिणाम आता क्रिकेटमध्येही पहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला मिळालेल्या वागणुकीवरून सुरू असलेला वाद आता अधिक गडद झाला आहे. याचे थेट पडसाद बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (BPL) पाहायला मिळत आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीपीएलच्या प्रेझेंटेशन पॅनलमधून एका भारतीय प्रेझेंटरला डच्चू दिला आहे.
मुस्तफिजुर रहमान आयपीएलमध्ये खेळणार होता. कोलकाताने त्याला ९ कोटी रुपये मोजून घेतले होते. परंतू, यामुळे शाहरुख खान आणि केकेआर ट्रोल होऊ लागल्याने बीसीसीआयच्या निर्देशांनुसार रहमानला आयपीएलमधून काढून टाकण्यात आले. यानंतर चिडलेल्या बांगलादेशने येणारा टी २० वर्ल्डकप भारतात खेळणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतू, आजच आयसीसीने बांगलादेशला तंबी देत भारतात खेळावेच लागेल असे सुनावले आहे. यानंतर बांगलादेशने भारताचा बदला घेण्यासाठी बीपीएलमध्ये काम करणाऱ्या भारतीय अँकरला काढून टाकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीपीएलच्या ब्रॉडकास्टिंग टीममध्ये समाविष्ट असलेल्या एका भारतीय महिला प्रेझेंटरला अचानक पॅनलमधून हटवण्यात आले आहे. अधिकृतरीत्या कोणतेही मोठे कारण दिले नसले तरी, मुस्तफिजुर प्रकरणावरून सोशल मीडियावर होणारी टीका आणि स्थानिक दबाव यामुळे बीसीबीने हा निर्णय घेतल्याचे समजते.
कोणाला काढले?
रिद्धिमा पाठक हे क्रीडा सादरीकरण जगतात एक प्रसिद्ध नाव आहे, तिने भारतात स्टार स्पोर्ट्स आणि सोनी स्पोर्ट्स सारख्या प्रसारकांसाठी असंख्य क्रिकेट शो आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रिद्धिमा पाकिस्तानच्या झैनब अब्बाससोबत बांगलादेशमध्ये बीपीएल २०२५-२६ चे सह-होस्टिंग करत होती, परंतु तिचा कार्यकाळ आता संपला आहे.
भारत-बांगलादेश क्रिकेट संबंधांवर परिणाम?
आयसीसी (ICC) आणि बीसीबी यांच्यात आधीच टी-२० वर्ल्ड कपच्या ठिकाणावरून वाद सुरू असताना, आता या नवीन प्रकरणाने भारत आणि बांगलादेश क्रिकेटमधील कटुता वाढण्याची शक्यता आहे. क्रीडा विश्वात अशा प्रकारे एखाद्या देशाच्या कर्मचाऱ्याला हटवणे हे चुकीचे संकेत देणारे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.