मराठवाड्यासह विदर्भाला गारपिटीचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 03:18 PM2018-02-11T15:18:07+5:302018-02-11T15:23:20+5:30

मराठवाडा आणि विदर्भाला जोरदार गारपिटीची तडाखा बसला आहे. अनेक भागात गारपिटी झाली असून, शेतक-यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

जालन्यातील वंजार उमरद गावातील येथील 70 वर्षीय नामदेव शिंदे यांचा गारा अंगावर पडून मृत्यू झाला. तर वाशिममध्ये महागाव येथे यमुना हुंबाड या महिलेचा दुर्दैवी अंत झालाय.

जालना शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात आज सकाळी आठ वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.

टपोऱ्या गारांमुळे रस्त्यावर, शेतात गारांचा पांढरा खच साचला होता. गारांमुळे जालना तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे.

अमरावतीतल्या अंजनगाव सुर्जी येथे रविवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर गारांसह जोरदार पाऊस बरसला. साधारण संत्र्याच्या आकाराएवढी मोठी गार येथे पाहावयास मिळाली.

वाशिमलाही आज गरपिटीचा फटका बसला आहे. वाकद परिसरात वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने उरलासुरला रब्बी हंगामही हातचा जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.