राज्यातल्या १० 'अशा' जागा, जिथं २०१९ लोकसभेला कमी मतांनी उमेदवार जिंकले, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 01:16 PM2023-10-08T13:16:27+5:302023-10-08T13:21:26+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात यंदाच्या निवडणुकीत महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळेल. परंतु ही निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची असल्याने यात कोण बाजी मारणार हे पाहणे गरजेचे आहे. राज्यातील १० लोकसभा जागा आहेत जिथे गेल्या निवडणुकीत मतांची टक्केवारी आणि विजयी उमेदवारांचे मताधिक्य फार कमी आहे त्यामुळे याठिकाणी यंदा कोण निवडून येईल हे आगामी काळ ठरवेल.

अमरावती – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या जागेवर अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा या विजयी झाल्या होत्या. तिथे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसुळ होते जे सध्या शिंदे गटासोबत आहेत. इथं नवनीत राणा यांना ५ लाख १० हजार ९४७ मते पडली तर अडसुळांना ४ लाख ७३ हजार ९९६ मते पडली होती.

छत्रपती संभाजीनगर – इथं वंचित आणि एमआयएम युतीचे इम्तियाज जलील हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता. जलील यांना ३ लाख ८९ हजार ४२ तर खैरेंना ३ लाख ८४ हजार ५५० मते पडली होती.

चंद्रपूर – काँग्रेसने राज्यात एकमेव जागा जिंकली होती ती चंद्रपूर, इथं बाळू धानोरकर हे निवडून आले होते. त्यांना ५ लाख ५९ हजार ५०७ मते पडली होती तर पराभव झालेले भाजपाचे हंसराज अहिर यांना ५ लाख १४ ७४४ मते पडली होती.

गडचिरोली – भाजपाचे अशोक नेते याठिकाणी ५ लाख १९ हजार ९६८ मते घेऊन निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांचा पराभव केला होता. काँग्रेस उमेदवाराला या मतदारसंघात ४ लाख ४२ हजार ४४२ मते पडली होती.

माढा – या मतदारसंघात भाजपाचे रणजित सिंह निंबाळकर यांनी ५ लाख ८६ हजार ३१४ मते घेत निवडून आले होते. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजयमामा शिंदे यांना ५ लाख ५५० मते पडली होती. त्यामुळे यंदा इथली राजकीय गणिते काय असतील हे पुढील काळात कळेल.

नांदेड – भाजपाचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांनी याठिकाणी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. चिखलीकर यांना निवडणुकीत ४ लाख ८६ हजार ८०६ मते तर अशोक चव्हाणांना ४ लाख ४६ हजार ६५८ मते पडली होती.

पालघर – या मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना ५ लाख ८० हजार ४७९ मते पडली होती. त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा पराभव केला होता. जाधव यांना ४ लाख ९१ हजार ५९६ मते पडली होती. गावित हे शिंदे गटात आले आहेत

परभणी – शिवसेनेचे संजय जाधव या मतदारसंघात ५ लाख ३८ हजार ९४१ मते घेऊन निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांचा पराभव केला होता. विटेकर यांना ४ लाख ९६ हजार ७४२ मते पडली होती.

रायगड – या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे ४ लाख ८६ हजार ९६८ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे खासदार राहिलेले अनंत गीते यांचा पराभव केला होता. या दोघांच्या मतांमध्ये फारशा फरक नाही. गीते यांना ४ लाख ५५ हजार ५३० मते पडली. सुनील तटकरे हे अजित पवारांसोबत सत्तेत आहेत.

शिरूर – राष्ट्रवादीने या मतदारसंघात अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. कोल्हे यांना ६ लाख ३५ हजार ८३० मते पडली. त्यांनी शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला. आढळरावांना ५ लाख ७७ हजार ३४७ मते पडली होती. आढळराव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहेत.