मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, महाराष्ट्र दौऱ्यावर निघताना संभाजीराजे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 02:29 PM2021-05-24T14:29:25+5:302021-05-24T14:45:25+5:30

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचाही फोन आला होता. त्यांच्याशी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी २७ किंवा २८ मे रोजी बैठक होईल. त्यानंतर आरक्षणप्रश्नी पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यभर दौरा करून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचाही फोन आला होता. त्यांच्याशी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी २७ किंवा २८ मे रोजी बैठक होईल. त्यानंतर आरक्षणप्रश्नी पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

येथील टाऊन हॉल परिसरातील नर्सरी गार्डनमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळास खासदार संभाजीराजे यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते बोलत होते.

आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी व ती राज्य सरकार व केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने खासदार संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली.

मराठा आरक्षणासंदर्भातील या दौऱ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील जास्तीतजास्त लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे.

कोल्हापूरातील इतर समाजातील प्रतिनिधींनी देखील याप्रसंगी उपस्थित राहून मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला. या सर्वांचा मराठा समाजाच्या वतीने मी अत्यंत ऋणी आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

कोल्हापूरातील मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक, आरक्षणाचे अभ्यासक, इतिहास संशोधक, विविध क्षेत्रातील विचारवंत तसेच इतर समाजातील प्रमुख व्यक्तींबरोबर संवाद साधला.

मराठा आरक्षणाविषयी सर्वांची मते जाणून घेतली. सर्वच स्तरातून मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा मिळत आहे, असे संभाजीराजें यांनी सांगितले.

कोल्हापूर-पंढरपूर-सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-नांदेड असा संभाजीराजेंचा आजचा दौरा असणार आहे.

न्यायालयाच्या चौकटीतून आरक्षण देता येते की नाही, येत नसेल तर इतर मार्गातून समाजाला काय देणार हे स्पष्ट केले पाहिजे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच पक्षातील आमदार, खासदारांनी पुढाकार घेतला पाहिजे.

मराठा आरक्षणप्रश्नांतून मार्ग काढण्यासाठी माझाही अभ्यास झाला आहे. राज्यभर फिरून विविध तज्ज्ञांची मते जाणून घेत आहे. विदर्भ, खानदेश आणि मराष्ट्राच्या विविध जिल्ह्याला भेटून समाजाच्या प्रुमख नेत्यांना भेटत आहे, असेही ते म्हणाले.