एक असं गाव जेथील ७० टक्के महिला तरूणपणीच होतात विधवा, कारण वाचून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:12 IST2025-06-10T15:45:02+5:302025-06-10T16:12:35+5:30

Village Of Widow : तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण भारतात एक असं गाव आहे ज्यााल 'विधवांचं गाव' म्हटलं जातं. हे जरा विचित्र वाटू शकतं, पण या गावाची कहाणी खूपच वेदनादायी आहे.

Village of Widows: भारतात अशी अनेक गावं आहेत ज्यांची काहीना काही वेगळी कहाणी असते. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण भारतात एक असं गाव आहे ज्यााल 'विधवांचं गाव' म्हटलं जातं. हे जरा विचित्र वाटू शकतं, पण या गावाची कहाणी खूपच वेदनादायी आहे. सिलिकोसिस नावाच्या आजारानं या गावातील पुरूषांचा लवकर मृत्यू होता. हा आजार त्यांना सॅंडस्टोनच्या खाणीत काम केल्यानं होतो.

राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यातील बुढपुरा गावाच्या आजूबाजूला खाणींमध्ये दगड फोडताना उडणाऱ्या धुळीमध्ये सिलिका नावाचं तत्व असतं. ही धूळ मजुरांच्या फुप्फुसात जाऊन गंभीर नुकसान करते. ज्यामुळे सिलिकोसिस नावाचा आजार होतो. या आजारात सुरूवातीला खोकला आणि तोंडातून रक्त येणे अशा समस्या होतात. जर यावर वेळीच उपचार केले नाही तर जीवही जाऊ शकतो.

जेव्हा घरातील काम करणारी मुख्य व्यक्तीच नसेल तर त्यांच्या पत्नीलाही खाणीत काम करायला जावं लागतं. त्यांना माहीत असतं की, याच कामामुळे त्यांच्या पतीचा जीव गेला. पण त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नाही. खाणीत काम करून त्यांना दिवसाल ३०० ते ४०० रूपये मिळतात. ही खाणच त्यांच्यासाठी आधार आहे.

खाणीत काम करणाऱ्या एका महिलेनं सांगितलं की, तिच्या पतीचा मृत्यू सिलिकोसिसमुळे झाला होता. पण परिवाराचं पोट भरण्यासाठी तिलाही खाणीत काम करावं लागलं. आता ती स्वत: या आजारानं पीडित आहे. एकदा का हा आजार झाला तर व्यक्ती जास्तीत जास्त पाच वर्ष जगू शकते. यावर ठोस काही उपचार नाही. हा आजार केवळ कंट्रोल केला जाऊ शकतो.

महिलांसोबतच त्यांची मुलंही हे काम करतात. याचा परिणाम असा होतो की, कमी वयातच त्यांना श्वास घेण्यास समस्या होते. डॉक्टरांनुसार, जे रूग्ण त्यांच्याकडे येतात. त्यातील ५० टक्के हे सिलकोसिसनं पीडित असतात.

डॉक्टरांनुसार, रोज ५० ते ६० रूग्ण श्वासासंबंधी समस्या घेऊन येतात. त्यातील अर्ध्यांना सिलिकोसिस असतो. एका ४५ वर्षीय रूग्णाबाबत डॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हा हा रूग्ण दवाखान्यात आला तेव्हा त्याची फुप्फुसं पूर्ण खराब झाली होती.

आज या गावात ३५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या ७० टक्के महिला विधवा आहेत. या गावाचं दुर्दैव असं आहे की, या गावातील लोक कधीच म्हातारे होत नाहीत. कारण तरूणपणीच त्यांचा जीव जातो.