Sri Lanka Crisis : खऱ्या अर्थानं मित्रासाठी भारत बनला संकटमोचक, श्रीलंकेला अशा प्रकारे करतोय मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 08:39 AM2022-05-21T08:39:11+5:302022-05-21T10:28:24+5:30

Sri Lanka Crisis : दिवसेंदिवस श्रीलंकेची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे.

Sri Lanka Crisis : दिवसेंदिवस श्रीलंकेची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. देशात नवे सरकार स्थापनही झाले आहे. नव्या पंतप्रधानांनी आपल्या पदाचा कार्यभारीही स्वीकारला आहे. परंतु देशाची परिस्थिती अतिशय बिकटच आहे.

श्रीलंकेची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की त्यांच्याकडे कर्ज फेडण्यासाठीदेखील पैसे नाहीत. इतिहासात प्रथमच श्रीलंकेला डिफॉल्टरच्या यादीत टाकण्यात आले आहे.

परंतु या कठीण काळात श्रीलंकेचा सर्वात विश्वासू मित्र भारत त्यांना मदत करत आहे. पुन्हा एकदा भारत त्यांना या संकटातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करतोय. श्रीलंकेच्या अशा परिस्थितीत त्यांना रविवार पर्यंत भारताकडून औषधांपासून, खाण्याच्या पिण्याच्या वस्तू आणि अन्य महत्त्वाच्या वस्तूही पोहोचवण्यात येणार आहेत.

भारताकडून श्रीलंकेला ९००० मेट्रिक टन तांदूळ, २०० मेट्रिक टन मिल्क पावडर, २४ मेट्रिक टन औषधं पोहोचवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हे पूर्ण कन्साइनमेंट रविवारपर्यंत श्रीलंकेत पोहोचेल.

दरम्यान, भारत सरकारनं श्रीलंकेला जवळपास ४५ कोटी रुपयांचं मदत साहित्यही पाठवले आहे. श्रीलंका सरकारनंदेखील वेळोवेळी भारतानं केलेल्या मदतीसाठी आभार मानले आहेत.

भारताकडून सातत्यानं श्रीलंकेला पाठिंबा दिला जात आहे. दरम्यान, श्रीलंकेत चीनचा वाढता प्रभाव पाहता भारतानं ही रणनिती आखल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान, या तज्ज्ञ कमर आगा यांनी आजतकशी साधलेल्या संवादादरम्यान भारत आणि श्रीलंकेची अनेक वर्षांच्या असलेल्या मैत्रिचा उल्लेख केला. तसंच भारत संधी साधत असल्याच्या चर्चांनाही चुकीचं म्हटलं.

भारत हा आपल्या शेजार धर्माचं पालन करत आहे. श्रीलंका पहिल्यापासूनच भारताचा मित्र होता आणि आजही आहे. आजही जेव्हा श्रीलंकेत संकट आलं तेव्हा पहिल्यांदा भारतच त्यांच्या मदतीसाठी पुढे आला. श्रीलंकेच्या विद्यमान सरकारलाही भारताशिवाय त्यांचा विकास शक्य नसल्याची जाणीव झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

श्रीलंकेची सध्या परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. नुकतंच श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी देशात केवळ एकाच दिवसाचं पेट्रोल शिल्लक राहिल्याचंही म्हटलं होतं. तर दुसरीकडे खाद्यपदार्ख आणि आवश्यक औषधांचीही कमतरता भासत आहे. अनेक ठिकाणी लोकांनी सरकार विरोधात आंदोलनही सुरू केलं आहे.