धुळीच्या वादळामुळे चीनमध्ये हाहाकार, ३४१ जण बेपत्ता, ४०० विमान उड्डाणे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 10:26 PM2021-03-15T22:26:07+5:302021-03-15T22:31:31+5:30

Sand storm hits China : चीनमध्ये गेल्या १० वर्षांतील सर्वात धोकादायक धुळीचे वादळ आले आहे. या वादळामुळे संपूर्ण बीजिंग शहर पिवळ्या रंगाने झाकोळून गेले आहे.

चीनमध्ये गेल्या १० वर्षांतील सर्वात धोकादायक धुळीचे वादळ आले आहे. या वादळामुळे संपूर्ण बीजिंग शहर पिवळ्या रंगाने झाकोळून गेले आहे. या वादळामुळे बीजिंगमधील हवेचा गुणवत्ता स्तर एक हजारांच्या पुढे गेला. तर ४०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करावी लागली.

हे धुळीचे वादळ मंगोलियाच्या पठारांवरून उडालेल्या धुळीमुळे आले आहे. मंगोलिया आणि चीनच्या उत्तर पश्चिम भागात झालेल्या पावसानंतर हे वादळ आले. या वादळामुळे बीजिंगमधील लोकांना भरदिवसा घरातील दिवे पेटवावे लागले.

या वादळानंतर चीनमधील प्रशासनाने सोमवारी बीजिंग आणि आसपासच्या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हे धुळीचे वादळ मंगोलियामध्ये सुरू होऊन गांसू, शांसी आणि हेबेई प्रांतापर्यंत फैलावले होते. चीनची राजधानी बीजिंग या प्रांतांच्या मध्ये आहे.

बीजिंगमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स कमाल ५०० पर्यंत पोहोचला आहे. काही जिल्ह्यांमध्ये १० पार्टिकलचा स्तर २००० हजार मायक्रोग्राम्स प्रति क्युबिक मीटरपर्यंत पोहोचला आहे. तर काही भागात एक्यूआय १००० हजार स्तर नोंद झाला आहे. प्रदूषण आणि आरोग्याच्या दृष्टीने हा स्तर अत्यंत धोकादायक आहे.

श्वसनासंबंधीच्या रुग्णांसाठी आणि फुप्फुसांसाठी धोकादायक असलेल्या पीएम २.५ पार्टिकलचा स्तर ३०० मायक्रोग्राम प्रति क्युबिक मीटरपर्यंत पोहोचला आहे. तर चीनमध्ये याचा स्टॅंडर्ड ३५ मायक्रोग्राम आहे. बीजिंगमध्ये दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात सँडस्टॉर्म येते असे हा भाग गोबीच्या वाळवंटाजवळ असल्याने होते. चीनच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे वाळवंटातून उडणारी धूळ थेट बीजिंगपर्यंत येते.

चीनमधील माध्यमांच्या म्हण्यानुसार मंगोलिया आणि आसपासच्या भागात धूळीचे वादळ आल्यानंतर ३४१ जण बेपत्ता झाले आहेत. चीनमधील निंगशिया नावाच्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, ते रात्री श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रात्रभर झोपता आले नाही.

चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. तर सरकारचा दावा आहे की, ते जंगले वाचवण्यासाठी खूप काम करण्यात येत आहे. मात्र तरीही वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.