भारताविरोधात पाकिस्ताननं रचलेला डाव फसला; सौदी हल्ल्यानंतर पलटला, स्वत:च्याच जाळ्यात अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 10:38 IST2026-03-05T10:33:23+5:302026-03-05T10:38:56+5:30

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू झालेले युद्ध आता अनेक देशांपर्यंत पोहचले आहे. यापुढच्या काळात या युद्धाची धग पाकिस्तानपर्यंतही पोहचू शकते असं बोलले जाते. यामागचे कारण म्हणजे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात झालेला संरक्षण करार..

सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील संरक्षण करारानुसार जर एखाद्या देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. परंतु आतापर्यंत पाकिस्तानने या लिखित करारातील वचनाला ठेंगा दाखवल्याचे दिसून येते. इराणने सौदी अरेबियातील अनेक प्रकल्पांवर हल्ले केले आहेत.

सप्टेंबर २०२५ मध्ये हस्ताक्षरित रणनीतीमध्ये एकमेकांशी संरक्षण करार करत मदत करण्याची डील पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात झाली होती. या करारानंतर संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले. त्यात कुठल्याही एका देशावर हल्ला झाला तर तो दोघांवरील हल्ला मानला जाईल अशी घोषणा करण्यात आली.

या करारामुळे आता इराणकडून सौदी अरेबियात टार्गेट हल्ला करण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने या युद्धात उतरणे गरजेचे होते. परंतु पाकिस्तानकडून यात कुठलाही पुढाकार घेतला जात नाही. सौदीत सातत्याने इराणी हल्ले सुरू आहेत.

सौदी अरेबियासोबत करार करताना पाकिस्तानने भारताला अप्रत्यक्षपणे सूचित केले होते, जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर तो हल्ला सौदी अरेबियावरही मानला जाईल आणि सौदी अरेबियाला त्याचा पलटवार देण्याचा अधिकार असेल.

सध्या इराणकडून सौदी अरेबियातील अनेक शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत. इराणने सौदीतील तेल रिफायनरीलाही टार्गेट केले आहे. परंतु पाकिस्तानकडून संरक्षण करारानुसार कुठल्याही पद्धतीचे पाऊल उचलले जात नाही.

पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर या हल्ल्यांचा निषेध करत आहे. परंतु सौदी अरेबियाला कुठलीही सैन्य मदत अथवा शस्त्रे देण्याबाबत काही बोलले नाहीत. त्यामुळे पाकिस्तान या कराराकडे दुर्लक्ष करत असून ते आपल्याच जाळ्यात अडकल्याची चर्चा आहे.

याबाबत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाक डार यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की, युद्ध सरू होण्यावेळी आम्ही सौदी अरेबिया आणि इराणच्या नेत्यांसोबत सातत्याने संपर्कात होतो. जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा इस्लामिक सहयोग संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मी सौदीत होतो. तिथेही सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्‍यांशी मी बोललो असं त्यांनी सांगितले.

मी माझ्या इराणी समकक्षांना सांगितले की आमचा सौदी अरेबियासोबत परस्पर संरक्षण करार आहे. तेव्हा त्यांनी मला सौदी अरेबियाची भूमी आमच्याविरुद्ध वापरली जाणार नाही याची खात्री करण्यास सांगितले. या संवादामुळे सौदी अरेबियावरील युद्धाचा परिणाम कमीत कमी झाला आहे असा दावा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्‍यांनी केला.

हे युद्ध लवकर संपावे ही भूमिका पाकिस्तानची आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर पाकिस्तानने तुर्की, बांग्लादेश, पॅलेस्टाईन, इराण, उज्बेकिस्तान, सौदी अरेबिया, कतार, ओमान, इराक, बहरीन आणि अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्र्‍यांशी आणि यूएईच्या उपपंतप्रधानांशी, युरोपियन युनियनचे उपाध्यक्षांशी फोनवरून संवाद साधल्याचे सांगितले आहे.