इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:02 IST2025-06-19T14:58:08+5:302025-06-19T15:02:45+5:30

इराणसोबत सुरू असलेल्या युद्धातच इस्त्रायलच्या एका टॉप संरक्षण अधिकाऱ्याने भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. भारत अथवा इस्त्रायलने या दोघांमध्ये काय चर्चा झाली याचा खुलासा केला नाही परंतु हा फोन कॉल अशावेळी आला आहे जेव्हा इराणकडून सातत्याने इस्त्रायलवर हल्ले सुरू आहेत.
इराणच्या हल्ल्यामुळे इस्त्रायलमध्ये दारू गोळा कमी पडत आहे. त्याशिवाय एअर डिफेन्स सिस्टमही इराणच्या मिसाईल हल्ल्यांना रोखण्यास अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे इस्त्रायलच्या संरक्षण खात्यातील टॉप अधिकारी भारतीय संरक्षण सचिवांशी चर्चा करतात त्याला विशेष महत्त्व आहे. माहितीनुसार, इस्त्रायलचे संरक्षण मंत्रालयातील डायरेक्टर जनरल आमिर बराम यांनी राजेश कुमार सिंह यांना स्वत: फोन लावला. त्यांना सध्याच्या परिस्थितीशी माहिती दिली. भारताचे संरक्षण सचिव यांच्याकडे देशातील दारूगोळा आणि शस्त्रे तयार करण्याची थेट जबाबदारी आहे. शस्त्रांच्या खरेदी-विक्रीपासून दारूगोळा निर्यात करण्याची जबाबदारी संरक्षण सचिव सांभाळतात.
इस्त्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लॉयनला प्रत्युत्तर म्हणून इराणने ऑपरेशन टू प्रॉमिस ३ लॉन्च केले. इराणने इस्त्रायलच्या सर्वात मोठ्या तेल अवीव शहरावर हायपरसोनिक मिसाईल फतेहचा वापर केला. इराणची ही मिसाईल इस्त्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टमलाही थांबवणे शक्य झाले नाही.
इस्त्रायलला मिळाली अमेरिकेची मदत - इराणच्या लांब पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाईल आणि हायपरसोनिक मिसाईल रोखण्यासाठी इस्त्रायली डिफेन्स फॉर्सेज अमेरिकेच्या मदतीने तयार केलेली एरो मिसाईल सिस्टमचा वापर करत आहे. परंतु इस्त्रायलजवळ आता खूप कमी दिवसाच्या एरो मिसाईल शिल्लक आहेत.
जर आता अमेरिकेने इस्त्रायलची मदत केली नाही किंवा युद्धात थेट उतरला नाही तर इस्त्रायलसाठी इराणसोबतचे युद्ध भारी पडणार आहे. एरो मिसाईलची रेंज २४०० किमी आहे. त्यामुळे आता अशी चर्चा सुरू झाली आहे इस्त्रायलला भारताकडून दारूगोळा अथवा एअर डिफेन्स सिस्टमची गरज भासणार आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आयएसीसीएस आणि आकाशतीर सिस्टमने पाकिस्तानी मिसाईल आणि ड्रोन हल्ले हाणून पाडले होते. भारत पाकिस्तान युद्धावेळी भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यानंतर पाकने भारताच्या सीमावर्ती भागातील शहरांवर ड्रोन, मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला.
इस्त्रायली सैन्य सध्या आयरन डोम एअर डिफेन्सचा वापर कमी अंतर असणारी मिसाईल, रॉकेट आणि ड्रोन हल्ले रोखण्यासाठी करत आहे. परंतु इराणकडून डागलेल्या ३०० मिसाईल पैकी कमीत कमी ४० मिसाईल अशा होत्या, ज्या एरो किंवा आयरन डोम डिटेक्ट करू शकले नाही. त्यामुळे तेल अवीव आणि हाइफा पोर्ट येथे झालेल्या हल्ल्यात बरेच नुकसान झाले.
याशिवाय मध्यम रेंजची डेविड स्लिंग मिसाईल प्रणालीचा वापर इस्त्रायल डिफेन्स फोर्सेजने केला होता. ज्याची रेंज ३०० किमी आहे. इस्त्रायलच्या डिजीने बुधवारी आपल्याच देशातील डिफेन्स फॅक्टरीचा दौरा केला होता. इस्त्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजमध्ये जाऊन बराम यांनी दारू गोळा निर्मितीबाबत आढावा घेतला.
भारत आणि इस्त्रायल यांच्यातील मजबूत संरक्षण संबंध जगासमोर लपले नाहीत. कारगिल युद्धापासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत इस्त्रायलने नेहमीच भारताची मदत केली आहे. ऑपरेशन सिंदूर काळात भारताने इस्त्रायली हारोप आणि हारपी ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानी दहशतवादी ठिकाणे आणि रडार सिस्टमला उद्ध्वस्त केले होते.
भारतीय हवाई दलाने लढाऊ विमानांचा वापर करून इस्त्रायलच्या रॅम्पेज मिसाईलने पाकिस्तानवर हल्ला केला. इस्त्रायल मागील २ वर्षापासून हमास आणि हिजबुल्लाहसारख्या दहशतवादी संघटनांशी लढत आहे. त्यामुळे इस्त्रायलला दारूगोळा कमी पडत आहे. विशेषत: इस्त्रायलला लांब पल्ल्याची एरो मिसाईलचा तुटवडा जाणवू लागला आहे.