India-China FaceOff: सीमावादावर भारत उचलतोय खतरनाक पाऊल; चीननं सतर्क राहावं, ग्लोबल टाइम्सचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 11:02 AM2022-02-22T11:02:25+5:302022-02-22T11:09:06+5:30

एकीकडे यूक्रेन-रशिया यांच्यात संघर्ष वाढला आहे तर दुसरीकडे भारत-चीन यांचे संबंध आणखी कटू होत चालले आहेत असं परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी म्यूनिख सुरक्षा संमेलन २०२२ च्या परिसंवादात सांगितले. चीन वारंवार सीमाभागात नियंत्रण रेषेचं उल्लंघन करत आहे असं भारतानं म्हटलंय.

तर भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या विधानानंतर भारत-चीन सीमावाद जागतिक पातळीवर मुद्दा उचलण्याचा भारत धोकादायक प्रयत्न करत असल्याचा दावा करत चीननं सतर्क राहावं असं चीन सरकारचं मुखपत्र समजल्या जाणाऱ्या ग्लोबल टाइम्समध्ये म्हटलं आहे.

ग्लोबल टाइम्सनं एस जयशंकर यांच्या विधानावर एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. त्यात म्हटलंय की, भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर जागतिक व्यासपीठावर चीन-भारत सीमा वादाचा २ वेळा उल्लेख केला आहे. त्याठिकाणी चीन गैरहजर होता.

भारत सरकार जागतिक पातळीवर हा मुद्दा उचलून फायदा उचलण्यासाठी पुढाकार घेत आहे. सीमावादावर आगीशी खेळ करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे अशा धोकादायक पाऊलांपासून चीननं सावध राहणं गरजेचे आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलंय.

चीन-भारत सीमा वादावार द्विपक्षीय संवादात तोडगा काढणं कठीण होत आहे असं भारताच्या निदर्शनास आल्यानंतर आता भारताने सर्वांसमोर हा मुद्दा आणला आहे. चीन-भारत सीमावादावर जागतिक पातळीवर चर्चा घडवून आणण्याचा भारत प्रयत्न करत आहे.

चायना इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे प्रा. लॅन जियांझू म्हणाले की, भारत चीनसोबतचा सीमावाद जागतिक पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतंय. द्विपक्षीय संवादात भारताला त्याचे लक्ष्य गाठणं कठीण आहे. त्यासाठी आता इतर देशांकडे भारताने हा मुद्दा मांडला आहे.

जागतिक पातळीवर हा मुद्दा उचलून त्या देशांच्या ताकदीचा वापर करत चीनवर दबाव आणण्याचं भारत रणनीती आखत आहे. या रिपोर्टमध्ये पुढे म्हटलंय की, जसजसं यूक्रेन संकट वाढत आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशाचं लक्ष भारताच्या प्रशांत सागराऐवजी रशिया आणि यूरोपवर लागलं आहे.

भारत या परिस्थितीमुळे घाबरला आहे. त्यामुळे चीनसोबत सीमावादाचा मुद्दा काढत भारत अमेरिकेचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा आवाज ऐकावा आणि दुर्लक्ष करु नये त्यामुळे दमन आणि चीनवर नियंत्रण ठेवा असं भारत विनंती करतोय असा दावा रिपोर्टमध्ये केलाय.

भारत-चीन यांच्यातील सीमावादावर तोडगा काढण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे द्विपक्षीय चर्चा आहे. भारत सध्याच्या स्थितीत जागतिक परिस्थितीचा वापर करत आहे. परंतु भारताचा हा डाव अयशस्वी होईल असा दावाही ग्लोबल टाइम्समध्ये केला आहे.

म्यूनिख सुरक्षा संमेलनात जयशंकर म्हणाले की, चीन सातत्याने सीमेवर तणाव निर्माण करत आहे. १९७५ पासून ४५ वर्ष सीमेवर शांती होती. कुठलाही सैनिक मारला गेला नाही. परंतु आता हे सर्व बदललं आहे. कारण चीननं LAC वर जवान तैनात न करण्याच्या कराराचं उल्लंघन करत आहे.