शिकला नाहीस, तर विकावा लागेल वडापाव! टोमणे ऐकून सुरू केला व्यवसाय; आज ५० कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 06:25 PM2021-02-03T18:25:53+5:302021-02-03T18:31:25+5:30

शिकला नाहीस, तर वडापाव विकावा लागेल. त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष दे, असे सल्ले-टोमणे अनेकांना ऐकायला मिळतात. व्यंकटेश अय्यर यांनीदेखील असे टोमणे ऐकले. आज व्यंकटेश यांच्या यशस्वी उद्योगाचा अभ्यास हार्वर्ड बिझनेस स्कूल, आयएमडी स्वित्झर्लंड आणि आयएसबी हैदराबादकडून सुरू आहे.

तुम्ही गोली वडापावचं नाव ऐकलं असेल. गोली वडापावचं आऊटलेट पाहिलं असेल. कदाचित तिथल्या वडापावची चवदेखील चाखली असेल. या गोली वडापावच्या स्थापनेची गोष्ट मोठी रंजक आणि प्रेरणादायी आहे.

चांगलं शिक्षण घेतलं नाही, तर वडापाव विकण्याची वेळ येईल, असे टोमणे आपल्या आसपास ऐकू येतात. व्यंकटेश यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं.

व्यंकटेश अय्यर एका तमिळ ब्राह्मण कुटुंबातले. व्यंकटेश यांनी चांगलं शिक्षण घेऊन इंजिनीयर, डॉक्टर, सीए व्हावं, अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती. व्यंकटेश वडापाव विकेल आणि त्याला इतकं यश मिळेल, त्याची भरभराट होईल याचा विचारदेखील कोणी केला नव्हता.

स्वत:चा बिझनेस सुरू करण्यापूर्वी व्यंकटेश यांनी १५ वर्षे फायनान्स क्षेत्रात काम केलं. पण रिटेल क्षेत्रात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न होतं. अनेकांना रोजगार द्यावे, असा त्यांचा मानस होता.

अखेर २००४ मध्ये व्यंकटेश यांनी कल्याणमध्ये गोली वडा पावचं पहिलं दुकान सुरू केलं. कॉलेजच्या पार्ट्यांपासून क्रिकेटच्या सामन्यांपर्यंत सगळीकडे वडापावला पसंती असल्यानं त्यांनी वडापाव विकण्याचा निर्णय घेतला.

वडापाव गर्दी खेचत असताना व्यंकटेश यांनी अनेक प्रयोग केले. पनीर वडापाव, शेजवान, मिक्स व्हेज, पनीर, आलू टिक्का यांच्यासारख्या विविध डिशेज त्यांनी आणल्या. सध्या त्यांनादेखील मोठी मागणी आहे.

सध्याच्या घडीला देशात गोलीची ३५० आऊटलेट्स आहेत. या सगळ्या आऊटलेट्समध्ये प्रत्येक दिवशी वडापावची चव सारखीच असेल याकडे व्यंकटेश यांनी विशेष लक्ष दिलं.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना व्यंकटेश अय्यर आपले आदर्श मानतात. गरजू आणि होतकरू मुलांना शिक्षण घेता यावं यासाठीही व्यंकटेश प्रयत्नशील आहेत.

Read in English