घरी बसून शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढलंय का? 'या' लक्षणांनी ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 10:44 AM2020-05-04T10:44:11+5:302020-05-04T11:02:32+5:30

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोरोनाचा लागण होण्यापासून रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे घरून काम करणं आणि घरीच बसून राहणं याशिवाय काहीही पर्याय नाही.

घरी बसल्यामुळे आणि हालचालीचा अभाव असल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. अनेकांना हाय कॉलेस्ट्रॉलची समस्या सुद्धा उद्भवत आहे. आज आम्ही तुम्हाला कॉलेस्ट्रॉल वाढण्याची काही लक्षणं सांगणार आहोत.

जास्त घाम येणं : गरमीच्या वातावरणात घाम येणं ही खूप कॉमन आणि नॅचरल गोष्ट असली तरी तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल तर सावधगिरी बाळगणं गरजेंच आहे. जास्त घाम येत असेल तर डॉक्टरांशी संपर्क करा. शरीराला सतत हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

पाय दुखणं : वेगवेगळ्या कारणांमुळे पाय दुखण्याची समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्हाला घरी बसून पाय दुखण्याची समस्या उद्भवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे साधेदुखी, पायांच्या नसा फुगणे अशा समस्या उद्भवतात.

दम लागणं : जास्त धावपळ न करता सुद्धा जर तुम्हाला अनेकदा दम लागत असेल तर दुर्लक्ष करू नका. कारण हे लक्षण शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढल्याचं असू शकतं. याशिवाय तीव्र डोकेदुखीच्या वेदना होत असतील तर कॉलेस्ट्रॉल लेव्हल वाढल्याची शक्यता असू शकते.

रक्तदाब वाढणं : शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे शरीरातील उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. रक्तदाब वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील मीठ व पाण्याचे वाढलेले प्रमाण बाहेर फेकण्याच्या प्रक्रियेतील बिघाड हे आहे.

लोक अनेकदा आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत. जंक फुडचं अतिसेवन यांमुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढते. त्यासाठी खूप जास्त फॅट असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करू नका.

जे लोक जास्त आळशी असतात. शारीरिकदृष्ट्या फारसे एक्टिव्ह नसतात. अशा लोकांना कॉलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या उद्भवते.

त्यासाठी मेदयुक्त पदार्थाचे सेवन करणं टाळा. संतुलित आहार घ्या, कमी तेलाच्या, कमी साखर, कमी मीठाच्या पदार्थांचा आहारात समावेश करा.रोज व्यायाम केल्याने आणि योगा केल्याने तुम्ही ताण- तणावमुक्त राहू शकता. त्यामुळे आजारांचा धोका टळेल.