Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 16:48 IST2025-05-05T16:36:49+5:302025-05-05T16:48:44+5:30

Causes of women violence in india: महिलांवरील वाढत्या अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त होते. एखादी घटना घडते... लोकांना चीड येते. संताप व्यक्त होतो, पण तुम्हाला माहितीये का की महिलांना सर्वाधिक छळ त्यांच्या घरातच सोसावा लागत आहे.

महिलाविरोधातील गुन्हे दिवसेंदिवस वाढत असून, धक्कादायक म्हणजे घरातच अधिक छळ होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. देशात हुंड्यासाठी अजूनही मारहाण होत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे एकूण ७,६९८ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये घरगुती हिंसा, मारहाण आणि गुन्हेगारी धमक्या या तक्रारी सर्वाधिक आहेत.

उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. देशातील एकूण तक्रारीरींपैकी ५० टक्के तक्रारी उत्तर प्रदेशातून आल्या आहेत.

आता आकडेवारीवर नजर टाकली तर दिसते की जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात ७ हजार ६९८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील १५९४ तक्रारी घरातच मारहाण झाल्याच्या आहेत. त्यानंतर ९५० मारहाणीच्या, तर ३९४ बलात्कार आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आहेत.

३०२ तक्रारी या लैंगिक छळ केल्याच्या आहेत. जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या ९८९, हुंडाबळीच्या ९१६, ३१० विनयभंगाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी वाढती जागरूकता आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गाविषयी माहिती वाढल्यामुळे तक्रारी वाढल्या असाव्यात.

मागील वर्षी आयोगाच्या पोर्टलवर २५,७४३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि त्यातील सन्मानाने जगण्याचा अधिकार, घरगुती हिंसा आणि हुंडाबळी या तक्रारी सर्वाधिक होत्या.

महिलांच्या छळाच्या, बलात्काराच्या आणि इतर स्वरुपाच्या छळाच्या तक्रारी राज्यनिहाय बघायला गेलं, तर सर्वाधिक तक्रारी उत्तर प्रदेशातील ३९२१ इतक्या आहेत. त्यानंतर दिल्ली ६८८, महाराष्ट्र ४७३, हरयाणा ३०६, बिहार ३४ या राज्यांचा क्रमांक लागतो.