कोण होती जेनाबाई दारुवाला?... दाऊद अन् हाजी मस्तानही तिचा हुकूम मानायचे, तिच्या इशाऱ्यावर डोलायचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:43 PM2021-09-07T17:43:16+5:302021-09-07T18:06:03+5:30

Underworld Queen Jenabai Daruwala : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नाव आज 'मोस्ट वाँटेड'च्या यादीत आहे. मुंबईसह देशाला हादरवणाऱ्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड हाच दाऊद इब्राहिम होता आणि नंतर तो जगासाठी डोकेदुखी ठरला. मात्र, हाच दाऊद एका महिलेच्या सांगण्यावरून काम करायचा, तिचा 'हुकूम' त्यांच्यासाठी आणि त्याचा 'गॉडफादर' हाजी मस्तानसाठीही शिरसावंद्य असायचा, असं सांगितलं तर तुमच्या भुवया उंचावतील. ही बाई म्हणजे मुंबईची माफिया क्वीन जेनाबाई दारुवाला.

आज जरी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतासह संपूर्ण जगासाठी डोकेदुखी बनला आहे, परंतु एक काळ असा होता जेव्हा दाऊद आणि त्याचा गॉडफादर हाजी मस्तान एका महिलेच्या सांगण्यावरून म्हणजेच तिच्या इशाऱ्यावर नाचायचे. आज आम्ही तुम्हाला मुंबईच्या माफिया क्वीन जेनाबाई दारूवाला कोण होती, तिच्याबद्दल सांगणार आहोत. 

हुसैन झैदी,यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकानुसार, झैनब उर्फ ​​जेनाबाई १९२० च्या सुरुवातीला मुस्लिम मेमन हलाईच्या कुटुंबात जन्मलेल्या सहा भावंडांपैकी एक होती. हे कुटुंब मुंबईतील डोंगरी परिसरात एका चाळीत राहत होते.

स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत्या -  जेनाबाई विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकापर्यंत डोंगरीमध्ये स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींच्या चळवळीत सामील झाल्याचे म्हटले जाते. जेनाबाई फक्त 14 वर्षांच्या असताना तिचा विवाह झाला. लग्नानंतरही त्या चळवळीशी संबंधित कार्यात सहभागी राहिलया. त्या काळात, एखाद्या हिंदूला कायद्यापासून किंवा पोलिसांपासून वाचवण्यासाठी आपल्या पतीकडून मारहाण देखील सहन करावी लागत असे. १९४७ मध्ये फाळणी दरम्यान जेनाबाईने मुंबई सोडण्यास नकार दिला आणि यामुळे नाराज होऊन तिचा नवरा तिची ५ मुले सोडून पाकिस्तानला गेला. जेनाबाई डोंगरातील चुनावाला बिल्डिंगमध्ये राहत होती. बेलासिस रोडवरील संपत्ती खरेदी करण्याची इच्छा हाजी मस्तानने जेनाबाईकडे बोलून तिचा सल्ला घेतला होता.  

१९४७ मध्ये फाळणी दरम्यान जेनाबाईंनी मुंबई सोडण्यास नकार दिला आणि यामुळे नाराज होऊन तिचा नवरा तिची ५ मुले सोडून पाकिस्तानला गेला. जेनाबाई डोंगरातील चुनावाला बिल्डिंगमध्ये राहत होती. बेलासिस रोडवरील संपत्ती खरेदी करण्याची इच्छा हाजी मस्तानने जेनाबाईकडे बोलून तिचा सल्ला घेतला होता.  

देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईत अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आणि महाराष्ट्र सरकारने गरिबांना स्वस्त दरात रेशन पुरवण्याचे काम सुरू केले. स्वत: सह तिच्या 5 मुलांना पोसण्यासाठी जेनाबाई तांदूळ विकण्याच्या व्यवसायात सामील झाल्या आणि येथून जेनाबाईने तस्करी केलेल्या तांदूळ विकण्याचे काम सुरू केले. तस्करांच्या संपर्कात आल्यानंतर आणि तांदूळ व्यवसायात तोटा झाल्यानंतर ती दारूच्या व्यवसायात आली. डोंगरीमध्ये ती दारू बनवून विकण्याचा व्यवसाय करायची. संपूर्ण परिसरात तिचा दबदबा होता आणि इथे जेनाबाईच्या नावाशी दारुवाला नाव जोडले गेले आणि ती जेनाबाई दारूवाला बनली.

दारूच्या व्यवसायात राहण्याच्या काळात जेनाबाईने पोलिसांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. 1962 मध्ये पोलिसांनी तिला बेकायदेशीर दारू विकल्याबद्दल अटक केली आणि त्या काळातील सर्वात मोठा बनावट दारू बनवण्याचा गोरखधंदा समोर आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याशी संपर्क झाल्यामुळे तिची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आणि नंतर ती पोलिसांची खबरी बनली. तिच्याच माहितीवरून पोलिसांनी तस्करांच्या ठिकाणांवर छापा टाकला आणि जप्त केलेल्या वस्तूंपैकी 10 टक्के वस्तू जेनाबाईला मिळत असे.

जेव्हा दाऊद केवळ 20 वर्षांचा होता, तेव्हा तो पहिल्यांदा जेनाबाई दारुवालाला भेटला. दाऊदचा गॉडफादर अर्थात मिर्झा हाजी मस्तानही जेनाबाईला आपली बहीण मानत असे आणि अनेकदा अडचणीत तिचा सल्ला घेण्यासाठी जात असे. गॉडफादरच्या पावलावर पाऊल ठेवून दाऊदही जेनाबाईचा चाहता झाला आणि तिला विचारून प्रत्येक मोठे काम करू लागला.

1990 च्या मध्यापर्यंत हा डोंगरी परिसर गोरखधंदे आणि गैर कारणांसाठी ओळखला जात होता. कारण डोंगरात अनेक टोळ्या आपापसात लढत असे आणि जातीय रक्तपाताचे मैदान बनले होते. तस्करी हा तिथला मुख्य व्यवसाय बनला होता आणि हा तो काळ होता जेव्हा दाऊद मुंबईत शक्तिशाली होत होता. जेनाबाईचे वयही वाढत चालले होते आणि तिच्या इशाऱ्यावरवर चालणारा दाऊद देखील तिच्यापासून दुरावत जात होता.

जेनाबाईचा मोठा मुलगाही तिच्या पावलावर पाऊल ठेवून चालू लागला आणि एकदा टोळीयुद्धात गोळ्या घालून त्याला ठार करण्यात आले. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जेनाबाईंनी सर्व काही सोडून धार्मिक मार्ग निवडला होता. तिला तिच्या मुलाच्या मारेकऱ्यांची माहिती मिळाली, पण या धार्मिक मार्गमुळे तिने त्यांना सोडून दिले.