राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:58 IST2025-06-10T14:55:30+5:302025-06-10T14:58:27+5:30

हनीमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्येत सोनम रघुवंशीला अटक झाल्याने प्रत्येक जण हैराण आहे. स्वत: सोनमचे वडील आणि तिच्या सासरच्यांना सोनमने राजाच्या हत्येचा कट रचला यावर विश्वास बसत नाही. रघुवंशी समाजाच्या माध्यमातून या दोन्ही कुटुंबाची भेट झाली. त्यानंतर लग्न ठरले, एकत्र शॉपिंग केली, लग्नाच्या तयारीनं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता त्यामुळे सोनम इतके टोकाचं प्लॅनिंग करू शकेल याची भनकही कुणाला नव्हती.

ही प्लॅनिंगही अशी होती ज्याच्या क्लायमॅक्समध्ये सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह हिरो म्हणून समोर आला असता आणि समाजातील लोकांनी त्याचे कौतुक केले असते. परंतु मेघालय पोलिसांनी या संपूर्ण प्लॅनिंगचे ७ दिवसांत पर्दाफाश केला. जगासमोर सोनमला दिदी म्हणणाऱ्या राजचा चेहरा उघड झाला.

२३ मे रोजी सोनम आणि राजा यांच्या बेपत्ता होण्याची खबर येताच शिलांग पोलीसही अवाक् झाले. ईस्ट खासी हिल्सचा वेइसाडोंग परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तिथलं नैसर्गिक सौंदर्य देशविदेशातील पर्यटकांना भूरळ पाडते. २ जून रोजी ईस्ट खासी हिल्सच्या एका १५० फूट दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. मात्र सोनमचा काहीच थांगपत्ता नव्हता.

त्यानंतर पोलीस अपहरण, हत्या यासह विविध अँगलने तपास करतात. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या बातमीमुळे मेघालय पर्यटनालाही फटका बसतो. मुख्यमंत्री पोलीस आणि प्रशासनाला सक्रीय करतात. हे प्रकरण लवकर सोडवण्यासाठी दिवसरात्र एक केली जाते.

पोलिसांना राजाच्या मृतदेहाशेजारी धारदार शस्त्रे पाहून या हत्याकांडात स्थानिक सहभाग नाही याचा अंदाज येतो. त्यानंतर पोलिस सोनमचा शोध सुरूच ठेवते. मेघालय पोलिस कायम इंदूर पोलिसांच्या संपर्कात होती. त्यात इंदूरमधील २ आरोपींच्या अटकेनंतर सोनम स्वत: गाजीपूरमध्ये समोर आली आणि तिचा प्लॅन फसला.

मग एकामागोमाग एक धागेदोरे सापडत जातात आणि राज कुशवाहची यात एन्ट्री होते. राज कुशवाह हा प्रकरण उघड होण्यापूर्वी अज्ञात व्यक्ती होता जो सोनम रघुवंशीच्या वडिलांना वेळोवेळी मदत करत होता. जेव्हा पहिल्यांदा राजचे नाव समोर आले तेव्हा सोनमचे वडील देवी सिंह यांनी त्यास नकार दिला.

राज कुशवाहा सोनमच्या वडिलांच्या प्लायवूड कारखान्यात काम करायचा. सोनम व्यवसायात एचआरचं काम सांभाळत होती. माहितीनुसार, सोनम आणि राज कुशवाहा एकमेकांच्या खूप जवळचे झाले होते. सोनमच्या वडिलांना हृदयविकार होता, त्यामुळे ती राजा रघुवंशीसोबतच्या लग्नाला विरोध करू शकत नव्हती.

तिने राजाचा काटा काढण्यासाठी आणि राज कुशवाहाला हिरो बनवण्याची योजना आखली. तिचा पती राजा रघुवंशीचा मार्गातून हटवण्यासाठी तिने हनीमूनसाठी अशी जागा निवडली जिथे मध्य प्रदेशातील खूप कमी कपल जातात. या योजनेत प्रियकर राज कुशवाहाला इंदूरमध्ये ठेवण्यात आले जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.

२० लाख रुपये देऊन तिने तिघांना सुपारी दिली. हे तेच लोक होते जे मेघालयात सोनम आणि राजासोबत दिसले होते. तिथल्या गाईडने याबद्दल सांगितले होते. राज कुशवाहा सोनमला दीदी म्हणून हाक मारत असे त्यामुळे देवी सिंहला कधीच कळले नाही की त्यांच्या कंपनीत काय गोंधळ सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा हे प्रकरण थंड झाले असते तेव्हा सोनम रघुवंशी समोर येणार होती. ती स्वतःला राजा रघुवंशीची विधवा म्हणून दाखवणार होती. सोनमने राजला वचन दिले होते की ती विधवा झाल्यावर त्याच्याशी लग्न करेल. त्यानंतर विधवेशी लग्न करून राज कुशवाहा देवी सिंह आणि समाजाच्या नजरेत हिरो बनेल. परंतु मेघालय पोलिसांनी राजाचा मृतदेह सापडल्यानंतर सात दिवसांत हे गुंतागुतीचे प्रकरण सोडवले. मेघालय पोलिसांनी सोनमला पाटण्याहून ताब्यात घेतले आणि निघून गेले. दुसऱ्या पथकाने राज कुशवाहासह दोन आरोपींना इंदूरहून ट्रान्झिट रिमांडवर घेतले आहे.