Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:18 IST2025-12-19T16:07:05+5:302025-12-19T16:18:22+5:30
Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : जामीन अर्जात सोनमने स्वतःला पूर्णपणे निर्दोष असल्याचं म्हटलं असून आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला आहे.

इंदूरमधील गाजलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता राजकीय, कौटुंबिक आणि कायदेशीर हालचालींना पुन्हा वेग आला आहे. या खळबळजनक प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राजा रघुवंशीची पत्नी सोनम हिने शिलाँग न्यायालयात जामीन अर्ज दाखल केल्याची पुष्टी झाली आहे.

जामीन अर्ज समोर आल्यानंतर या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं असून सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलं आहे. जामीन अर्जात सोनमने स्वतःला पूर्णपणे निर्दोष असल्याचं म्हटलं असून आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला आहे.

अर्जानुसार, सोनमचे म्हणणे आहे की, ती आपल्या लग्नामुळे आनंदी होती आणि पती राजा रघुवंशीसोबत तिचे संबंध चांगले होते. या प्रकरणात आपलं नाव चुकीच्या पद्धतीने ओढलं गेलं असल्याचंही तिने अर्जात नमूद केलं आहे.

याचिकेमध्ये सोनमने सह-आरोपी राज कुशवाह याच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधांचा स्पष्टपणे नकार दिला आहे. सोनमच्या म्हणण्यानुसार, ती राज कुशवाहला भाऊ मानत होती.

राज आणि तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चुकीचे किंवा आक्षेपार्ह संबंध नव्हते. या जामीन अर्जाद्वारे सोनमने न्यायालयाकडे तिला दिलासा देण्याची विनंती केली आहे. राजा रघुवंशीचा भाऊ विपिन रघुवंशी याने सोनमच्या जामीन अर्जावर कठोर भूमिका घेतली आहे.

सोनमचा जामीन मंजूर व्हावा यासाठी तिचे संपूर्ण कुटुंब सक्रियपणे प्रयत्न करत असल्याचा आरोप विपिनने केला आहे. आरोपी पक्ष सातत्याने कायदेशीर प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असून, यामुळे निष्पक्ष चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं असंही विपिनने म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, राजा रघुवंशी हत्याकांडात सोनमसह एकूण चार आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, तर अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष अद्याप बाकी आहे.

अशा परिस्थितीत, या टप्प्यावर जामिनाचा निर्णय केसची पुढील दिशा ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. आता या संपूर्ण प्रकरणात सर्वांच्या नजरा शिलाँग न्यायालयाकडे लागल्या आहेत.

न्यायालयाचा येणारा निकाल केवळ आरोपींच्या भवितव्यावरच परिणाम करणार नाही, तर या बहुचर्चित हत्या प्रकरणातील सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेलाही नवी दिशा देऊ शकतो.

















