"निक्कीला प्रोफेसर व्हायचं होतं, गॅरेजमध्ये 18 तास काम करून मुलीला शिकवलं पण तिने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 04:07 PM2023-02-19T16:07:50+5:302023-02-19T16:17:15+5:30

Nikki Yadav : दिल्लीतील निक्की यादव हत्या प्रकरणातील वडील सुनील यादव यांना आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

दिल्लीतील निक्की यादव हत्या प्रकरणातील वडील सुनील यादव यांना आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. आपल्या मुलीने साहिलशी लग्न केलं असेल यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नाही. ते म्हणतात की, जर माझ्या मुलीने हे केलं असतं तर तिने मला नक्कीच सांगितले असते.

मला जर हे माहीत असतं तर मी मुलीसोबत असं होऊच दिलं नसतं. मात्र पोलीस जे सांगत आहेत ते खरं असू शकतं. पोलिसांच्या तपासावर समाधानी असल्याचं निक्कीच्या वडिलांनी सांगितलं. ते म्हणाले की, आयुष्यात काही चांगले असो वा वाईट, मुलांनी वडिलांपासून काहीही लपवू नये.

निक्कीच्या हत्येला नऊ दिवस उलटून गेले, पण अजूनही तिचे वडील सुनील यादव यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "मी माझ्या मुलीचे मोठ्या अभिमानाने पालनपोषण केले आहे. मुलीला चांगले लिहिता-वाचता यावे म्हणून गॅरेजमध्ये 18 तास काम केले."

निक्कीला प्रोफेसर व्हायचं होतं. आजोबांचीही इच्छा होती की त्यांनी शिक्षणतज्ज्ञ व्हावे. त्यामुळेच तिला इंग्रजी ऑनर्ससह पीएचडीही करायची होती. दीड महिन्यापूर्वीच ती घरी आल्याचं त्यांनी सांगितलं. यादरम्यान ती लिव्ह-इनमध्ये आहे किंवा तिने लग्न केलं आहे, असं कुठेही दिसत नव्हतं.

वडील सुनील यादव यांनी सांगितले की, निक्की लहान बहीण निधीसोबत राहायची. दोघींनी दिल्लीतील उत्तम नगरमध्ये भाड्याचे घर घेतले होते. पण निधीलाही निकीने लग्न केल्याची कोणतीही माहिती नाही. देशातील सर्व मुलींनी आपल्या पालकांना सर्व काही सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.

निक्कीची आई म्हणाली, साहिल माणूस कसा असू शकतो. तो माणूस नाही, तो राक्षस आहे. त्याने दोन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. माझी मुलगी गेली. अशा राक्षसाला फाशी द्यावी. निक्कीने काहीही लपवले नाही. तिने लग्न केले असते तर नक्कीच सांगितले असते असंही त्यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

निक्की यादव हिच्या हत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांची मुलगी अचानक त्यांना कशी सोडून गेली, याचा कुटुंबीयांना धक्का बसला आहे. निक्की यादवच्या हत्येची माहिती कुटुंबीयांना बऱ्याच दिवसांनी मिळाली.

निक्कीच्या काकांनी सांगितले की, जेव्हा निक्की बेपत्ता झाली तेव्हा तिचे वडीलही तिला शोधण्यासाठी आरोपी साहिल गहलोतच्या घरी गेले होते. पण तिथेही त्यांना आपल्या मुलीबद्दल काहीच माहिती नव्हती. आरोपी साहिलने त्यांना आपल्या मुलीबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

निक्की यादवची हत्या केल्यानंतर साहिल गेहलोतने दुसरं लग्न केलं होतं. साहिलने 9 फेब्रुवारीच्या रात्री निक्कीची हत्या केली आणि 10 फेब्रुवारीला गावात येऊन विधीवत दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आहे.

निकीच्या हत्येप्रकरणी पोलिसांचा वाढता दबाव पाहून त्याने चौथ्या दिवशी आपल्या हातून एका मुलीची हत्या झाल्याचे पत्नीला सांगितले. आता पोलीस त्याला पकडतील. म्हणूनच तिने तिच्या घरी जावं असंही त्याने सांगितलं. या प्रकरणाची माहिती मिळताच मंगळवारी सकाळी मुलीच्या कुटुंबीयांनी तिला घरी आणलं. साहिलला पोलिसांनी पकडले