Mansukh hiren death case : एटीएसचा मोठा खुलासा; सचिन वाझेला व्हायचं होतं 'सुपरकॉप', हिरेनच्या हत्येची दिली होती ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 10:38 AM2021-03-22T10:38:41+5:302021-03-22T10:51:42+5:30

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलीसमधील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांची या प्रकरणात मुख्यभूमिका होती आणि ते मुख्य आरोपी म्हणून समोर आले आहेत. (Mansukh hiren death)

मुंबईतील व्यवसायी मनसुख हिरेनच्या कथित हत्या प्रकरणाचा गुंता सुटल्याचा दावा करत महाराष्ट्र एटीएसने दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात एटीएसने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला मुख्य आरोपी केले आहे. तसेच एटीएसने एक पोलिस कर्मचारी आणि एका सट्टेबाजाला अटक केली आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलीसमधील निलंबित अधिकारी सचिन वाझेची या प्रकरणात मुख्यभूमिका होती आणि वाझे मुख्य आरोपी म्हणून समोर आला आहे.

एटीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे (५१) आणि बुकी रमणिकलाल नरेश गोर (३१) असे आहे. यांना एटीएसने रविवारी अटक केली. शिंदे हा 2006 मध्ये झालेल्या लाखन भैया बनावट चकमकीतील दोशी आहे. तो गेल्यावर्षीच फर्लोंवर जेलमधून बाहेर आला आहे. तेव्हापासूनच शिंदे वाझेंच्या संपर्कात होता.

मनसुखच्या हत्येवेळी वाझे उपस्थित नव्हते - शिंदे मे 2020 पासूनच रिटायर्ड एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या टीममध्ये सचिन वाझेसोबत काम करत होता. या प्रकरणात आणखीही काही पोलीस सहभागी असल्याचा संशय एटीएसला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एटीएसच्या मते, वाझेनेच कथितरित्या मनसुखला मारायला सांगितले होते. मात्र, हत्येच्या वेळी ते स्वतः तेथे उपस्थित नव्हते. एटीएसने वाझे आणि इतरांनी मनसुखसोबत साधलेल्या संवादाच्या कॉल रेकॉर्डच्या आधारे एटीएसने संशयितांना पकडले आहे.

गौर आणि शिंदेंना 30 मेपर्यंत पोलीस कोठडी - गौर आणि शिंदे यांना एटीएस न्यायालयात हजर करण्यात आले. येथे त्यांना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. एटीएस प्रमुख जयजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुकी गौरने पाच सिम कार्ड विकत घेतले होते आणि ते शिंदेला दिले होते. एटीएसचे म्हणणे आहे, की ही केवळ सुरुवातच आहे. एक दोन दिवसांत आणखी संशयितांना अटक करण्यात येईल.

'या' दोन कारणांमुळे वाझेने रचला कट - अट केलेल्या या दोन आरोपींनी आपल्यावरील आरोप स्वीकारलेले नाहीत. मात्र वाझे आणि इतर काही पोलीस कर्मचाऱ्यांवर खुलासे करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाझेने मनसुखला स्फोटकं ठेवण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, त्याने नकार दिला होता.

वाझेच्या टेरर केस तयार करण्यामागे दोन थेअरीदेखील समोर आल्या आहेत. एका अधिकाऱ्याने म्हटले आहे, की 'स्वतःच केस सॉल्व करून सुपर कॉप बनण्याची वाझेची इच्छा होती अथवा ते आणि काही इतर पोलीस कर्मचारी (यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश आहे) एका प्रायव्हेट सिक्यॉरिटी फर्ममध्ये सामिल होण्याची इच्छा होती. ही फर्म एका कॉर्पोरेटने लॉन्च केली आहे.'

'या' भीतीमुळे तयार करण्यात आला मनसुखच्या हत्येचा कट- प्राथमिक तपासानुसार, वाझे यांना भीती वाटत होती, की मनसुख त्यांच्या प्लॅनसंदर्भात सर्व काही उघड करेल. म्हणून त्याला मारण्याचा प्लॅन तयार करण्यात आला.

मनसुखला मारण्याचा कट 2 मार्चलाच तयार करण्यात आला होता. एवढेच नाही, तर वाझेने यासंदर्भात दोन सहकाऱ्यांसोबत क्रॉफर्ड मार्केट येथील आपल्या हेडक्वॉर्टरमध्ये दोन तास बैठकही केली होती.

शिंदेनेच स्वतःला 'तावडे साहेब' सांगितले होते - एटीएस अधिकाऱ्यांच्या नुसार, शिंदेने हिरेनला उपनगर कांदीवली येथून चार मार्चला फोन केला होता आणि आपण 'तावडे साहेब' असल्याचे सांगितले होते. यानंतर दोन दिवसांनीच हिरेन यांचा मृतदेह हस्तगत करण्यात आला.

हिरेन चार मार्चला ठाण्यातील आपल्या घरून निघाले होते आणि पत्नी विमला यांना सांगितले होते, की त्यांना कांदीवली येथे 'तावडे साहेबां'नी चौकशीसाठी बोलावले आहे.