Paytm पेमेंट्स बँकेच्या 'या' सेवा १५ मार्च नंतर काम करणार नाहीत, पटापट चेक करा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 08:48 AM2024-03-12T08:48:05+5:302024-03-12T08:54:58+5:30

रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवांसाठी १५ मार्च ही अंतिम मुदत ठेवली आहे. म्हणजेच त्यांच्या काही सेवा १५ मार्चनंतर बंद होतील.

रिझर्व्ह बँकेनं (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवांसाठी १५ मार्च ही अंतिम मुदत ठेवली आहे. म्हणजेच त्यांच्या काही सेवा १५ मार्चनंतर बंद होतील. तर काही सेवा यानंतरही काम करत राहतील, जसं की मनी विड्रॉल, रिफंड, कॅश बॅक, युपीआयद्वारे पैसे काढणं आणि ओटीटी पेमेंट्स इत्यादी.

पेटीएम पेमेंट्स बँक युझर्स १५ मार्चनंतरही त्यांच्या खात्यातून किंवा वॉलेटमधून त्यात असलेली रक्कम काढू शकतील. पेटीएम पेमेंट्स बँक खात्यातून व्याज मिळू शकतं. त्यांचे पार्टनर बँक रिफंड, कॅशबॅक आणि स्वीपइन करू शकतात.

जोपर्यंत खात्यात शिल्लक रक्कम उपलब्ध आहे, तोपर्यंत पैसे काढणं किंवा डेबिट ऑर्डर (NACH ऑर्डरप्रमाणे) पेटीएम पेमेंट्स बँक खात्यातून केल्या जाऊ शकतात. पेटीएम पेमेंट्स बँक वॉलेटचा वापर मर्चंट पेमेंट करण्यासाठी केला जाऊ शकतो.

१५ मार्चनंतरही तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँक वॉलेट बंद करू शकता. युझर्सना वॉलेट बंद करण्याचा आणि शिल्लक दुसऱ्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय असेल. खात्यातील शिल्लक असेलपर्यं फास्टॅग १५ मार्चनंतरही उपलब्ध असेल. शिल्लक संपल्यानंतर, युझरला त्यात अधिक रक्कम टाकण्याचा पर्याय मिळणार नाही.

युझर्सना त्यांच्या पेटीएम बँक खात्यातून UPI ​​किंवा IMPS द्वारे पैसे काढण्याचा पर्याय देखील असेल. सध्याची शिल्लक मंथली OTT पेमेंट करून वापरली जाऊ शकते, परंतु १५ मार्च नंतर, ते दुसऱ्या बँक खात्याद्वारे करावं लागेल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सेवा सुरू ठेवण्यासाठी युझर्सना सॅलरी क्रेडिट, ईएमआय पेमेंट आणि अन्य फास्टॅग रिचार्ज करण्याच्या सुविधेसाठी आणखी बँक खातं जोडणं आवश्यक आहे किंवा आपल्या बँक खात्याला पेटीएम पेमेंट्स बँकेतून दुसऱ्या बँकेत बदलावं लागेल.

खात्यांमध्ये पैसे टाकणं, फास्टॅग सेवा किंवा वॉलेट सेवा १५ मार्चनंतर काम करणार नाहीत. याशिवाय युझर्स कोणत्याही अन्य युझरकडून पेटीएम बँक खात्यात पैसेही घेऊ शकणार नाहीत. सॅलरी किंवा अन्य डायरेक्ट बेनिफिट्स, पेटीएमद्वारे जारी करण्यात आलेल्या फास्टॅग बॅलन्सला अन्य फास्टॅगमध्ये ट्रान्सफरही करता येणार नाही.

दरम्यान, रिझर्व्ह बँकही १५ मार्चनंतर पुन्हा दिलासा देण्याच्या विचारात नाही. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की पेटीएम पेमेंट्स बँकेशी जोडलेले वॉलेट इतर बँकांशी जोडण्याची अंतिम मुदत १५ मार्च निश्चित करण्यात आली आहे. ही मुदत वाढवण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

१५ मार्चपर्यंत दिलेली मुदत पुरेशी असून ती वाढवण्याची गरज नसल्याचं दास यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की ८०-८५ टक्के पेटीएम वॉलेट इतर बँकांशी लिंक आहेत आणि उर्वरित १५ टक्के खाती इतर बँकांशी लिंक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.