मोदी सरकारने बंद केली नेहरूंच्या काळात सुरू झालेली अजून एक सरकारी कंपनी, हे कारण देत ठोकले ताळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 10:57 PM2021-03-17T22:57:05+5:302021-03-17T23:06:31+5:30

Handicrafts and handlooms export corporation of India : गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कंपन्यांची विक्री आणि खासगीकरणाचा तसेच कंपन्या बंद करण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान, आता मोदी सरकारने अजून एक कंपनी बंद करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कंपन्यांची विक्री आणि खासगीकरणाचा तसेच कंपन्या बंद करण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान, आता मोदी सरकारने अजून एक कंपनी बंद करण्याचा निर्णय़ घेतला आहे. काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारने दीर्घकाळापासून नुकसानीत असलेली हँडिक्राफ्ट्स अँड हॅँडलूम्स एक्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (HHEC) ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणात असलेल्या हँडिक्राफ्ट्स अँड हॅँडलूम्स एक्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीला बंद करण्यास मान्यता दिली आहे.

२०१५-१६ या आर्थिक वर्षापासून हँडिक्राफ्ट्स अँड हॅँडलूम्स एक्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी सातत्याने नुकसानीत चालली होती. त्यामुळे कंपनी चालवण्यासाठी आवश्यक असलेला खर्च करणासाठी पुरेसे पैसे उभारणे शक्य होत नव्हते. ही कंपनी पुन्हा सुस्थितीत येण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे कंपनी बंद करणे आवश्यक होते, असा दावा सरकारने केला आहे.

या कंपनीमध्ये ५९ पर्मनंट कर्मचारी आणि सहा मॅनेजमेंट ट्रेनी आहेत. सर्व पर्मनंट कर्मचारी आणि मॅनेजमेंट ट्रेनींना सार्वजनिक उद्योग विभागाद्वाने निर्धारित पद्धतीनुसाप स्वेच्छानिवृत्ती प्राप्ती योजनेचा लाभ घेण्याची संधी दिली जाईल.

एचएचईसीला बंद करण्याच्या निर्णयामुळे सरकारी खजिन्याची बचत होणार आहे. त्यामुळे आजारी सीपीएसईमधील वेतन आणि भत्त्यांवर होणाऱ्या खर्चामध्ये कपात होणार आहे. हा एक सार्वजनिक उपक्रम आहे. जो संचालनामध्ये नाही आहे. तसेच या कंपनीमधून काही उत्पन्नही मिळत नव्हते.

एचएचईसी भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अधीन असलेली कंपनी आहे. ही कंपनी भारतीय हस्तशिल्प, भारतीय हथकरघा, भारतीय सजावट भारतीय भेटवस्तू, भारतातील प्राचीन वस्तू, चामड्याची साजावट, रत्न आणि आभूषण, चामड्याच्या सजावटीच्या वस्तू, लोखंडाचे हस्तशिल्प या व्यवसायाशी संबंधित होती.

या कंपनीची स्थापना १९५८ मध्ये झाली होती. भारतीय हस्तशिल्प, भारतीय सजावट भारतीय भेटवस्तू, भारतातील प्राचीन वस्तू, चामड्याची साजावट, रत्न आणि आभूषण, चामड्याच्या सजावटीच्या वस्तू, लोखंडाचे हस्तशिल्पसारख्या उत्पादनांना जगभरातील बाजारात पोहोचवण्याचा या कंपनीच्या स्थापनेमागचा उद्देश होता.