मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 13:03 IST2025-06-29T12:54:33+5:302025-06-29T13:03:55+5:30

Financial Guide : अलीकडच्या काळात अनेक जोडपी मुलं जन्माला घालण्यास टाळाटाळ करत आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. पण, यातही आर्थिक खर्च हे महत्त्वाचे मानले जाते.

आजच्या महागाईच्या काळात शहरांमध्ये मुलांचे संगोपन करणे हे एक मोठे आर्थिक आव्हान बनले आहे. बंगळुरू येथील स्टार्टअप संस्थापक मीनल गोयल यांनी लिंक्डइनवर शेअर केलेल्या एका पोस्टने या वास्तवाकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, शहरात एका मुलाला जन्मापासून ते पदवीपर्यंत मोठे करण्यासाठी तब्बल ३८ ते ४५ लाख रुपये खर्च येऊ शकतो. या आकडेवारीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

मीनल गोयल यांनी संपूर्ण खर्चाचे गणित मांडले आहे, ज्यावरून एका वर्षातील अंदाजित खर्च समजू शकतो. पहिली ५ वर्षे: यामध्ये प्रसूती, लसीकरण, डे-केअर आणि बाळाच्या आवश्यक वस्तूंचा खर्च येतो. या काळात सुमारे ८ लाख रुपये खर्च होतात, म्हणजेच दरवर्षी सरासरी १.६ लाख रुपये.

६ ते १७ वर्षे: या १२ वर्षांच्या काळात शाळेची फी, शिकवणी, गॅझेट्स आणि अभ्यासेतर क्रियाकलापांवर १७ लाख रुपयांपर्यंत खर्च होतो, म्हणजेच दरवर्षी सरासरी १.४२ लाख रुपये.

उच्च शिक्षण: पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी खाजगी महाविद्यालयांचे शुल्क आणि राहण्याचा खर्च मिळून १३ लाख किंवा त्याहून अधिक खर्च येतो, जो सर्वात मोठा खर्च आहे.

दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूसारख्या महानगरांमध्ये मुलांचे शिक्षण, आरोग्यसेवा आणि बालसंगोपन खूप महाग आहे. आंतरराष्ट्रीय आणि खाजगी शाळा दरवर्षी १ ते ९ लाख रुपयांपर्यंत फी आकारतात. याशिवाय, नोकरी करणाऱ्या पालकांना डे-केअर किंवा घरगुती मदतनीस ठेवण्यासाठी दरमहा १५,००० ते २०,००० रुपये खर्च करावा लागतो.

मुलांच्या संगोपनाचा खर्च फक्त शिक्षण आणि आरोग्यपुरता मर्यादित नाही. आरोग्य विमा आणि खाजगी रुग्णालयाचा खर्च. ब्रँडेड कपडे आणि टेक गॅझेट्स. वाढदिवसाच्या पार्ट्या, शाळेच्या सहली आणि कुटुंबाच्या सुट्ट्या यांचाही यात समावेश होतो.

भारतातील शिक्षणाचा महागाई दर दरवर्षी १०-१२% आहे, जो सामान्य महागाई दरापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ, आजचा १० लाख रुपयांचा खर्च पुढील १५ वर्षांत जवळपास ४० लाख रुपयांवर पोहोचू शकतो. त्यामुळे, मुलांचे संगोपन हा केवळ प्रेम आणि नातेसंबंधांचाच नाही, तर एक विचारपूर्वक केलेला आर्थिक निर्णय बनला आहे. यासाठी पालकांनी योग्य आर्थिक नियोजन करणे आणि बचतीवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे.