Heat, Inflation and EMI: कधी विचारही केला नसेल! भीषण गर्मी वाढविणार ईएमआय आणि महागाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 11:06 AM2023-03-03T11:06:25+5:302023-03-03T11:14:50+5:30

अल निनो ठरणार व्हिलन, अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गर्मीने रेकॉर्ड मोडला आहे. मार्च महिन्यातही तापमान सर्वसामान्यापेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे. यामागे एक घटक कारणीभूत आहे ‘अल निनो’. हा अल निनो केवळ तापमानच वाढविणार नाही, तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर माेठा परिणाम हाेऊ शकताे. त्याच्या प्रभावामुळे महागाई आणि ईएमआय वाढण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात प्रचंड ऊन तापणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. सरासरी तापमान सर्वसामान्यापेक्षा ५ ते १० टक्के जास्त राहू शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. म्हणजेच, उष्णतेच्या लाटा जास्त राहतील आणि त्याचा एकंदरीत कृषी उत्पादनावर माेठा परिणाम हाेऊ शकताे. परिणामी महागाई वाढण्याची भीती असून ती आटाेक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढविला जाऊ शकताे. त्यामुळे ईएमआयदेखील वाढण्याची शक्यता आहे.

कृषी उत्पादनावर परिणाम हाेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कृषी उत्पादनाच्या किमती वाढतील. भाजीपाल्याचेही उत्पादन घटेल.

अन्नधान्याच्या किमतीत वाढ हाेण्याचा अंदाज ‘क्रिसिल’नेदेखील वर्तविलेला आहे. रब्बीची पेरणी वाढली तरीही चिंता कायम.

गर्मी वाढल्यास एसी आणि फ्रीजचा वापर वाढतो. त्यामुळे वीजवापरही वाढतो. जानेवारीत २११ गीगावॅट वीजवापर झाला आहे. एवढा वापर गेल्यावर्षी उन्हाळ्यात होता. एकंदरीत उन्हाळ्यात वीजवापर २० ते ३० टक्के वाढू शकतो.

प्रशांत महासागरात अल निनाे आणि ला निना हे दाेन घटक जगभरात प्रभाव पाडतात. ला निनाचा भारताला फायदा हाेता. मात्र, अल निनाेचा विपरीत परिणाम हाेताे. त्याच्या प्रभावामुळे थंडी आणि गर्मी दाेन्ही वाढते. काेरडे हवामान राहते.

युक्रेन युद्धानंतर गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस एवढे हवे. मात्र, अनेक ठिकाणी तापमान ३५ अंशावर असून किमान तापमानही १० ते १५ अंश सेल्सिअसवर आहे. याचा उत्पादनावर परिणाम हाेऊ शकताे. उत्पादन घटल्यास गहू आणखी महाग हाेईल.

गव्हाच्या पिकाला नुकसान होऊ नये, यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी. सध्यातरी तापमानाचा परिणाम दिसलेला नाही. तापमान वाढल्यास खूप जास्त पाणी द्यायला नकाे. गरम वारे वाहू लागल्यास ही काळजी अधिक घ्यायला हवी.