सणाच्या वेळी घरी जायला मिळाली नाही बस, सूचली कल्पना; ५ लाखातून उभी केली ७००० कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 08:34 AM2024-03-02T08:34:49+5:302024-03-02T08:52:29+5:30

रेडबस भारतातील सर्वात मोठी ऑननलाइन बस तिकिटिंग कंपनी आहे. आपल्या मित्रांसह फणींद्र यांनी कंपनीचा पाया रचला.

फणींद्र सामा हे देशातील परिचित उद्योजक आहे. ते रेडबसचे संस्थापकही आहेत. रेडबस भारतातील सर्वात मोठी ऑननलाइन बस तिकिटिंग कंपनी आहे. आपल्या मित्रांसह त्यांनी या कंपनीचा पाया रचला. तिघांनीही मिळून यासाठी ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. आता हीच कंपनी ७ हजार कोटींची कंपनी झाली आहे.

सणासुदीच्या कालावधीत घरी जाण्याची वेळ आली, तेव्हा तिकीट बूक करण्यास समस्या आल्या, त्याच वेळी फणींद्र यांना याची कल्पना सूचली. यानंतर या कंपनीचं इबिबो समुहानं अधिग्रहण केलं. जाणून घेऊया फणींद्र यांच्या या प्रवासाबद्दल.

फणींद्र हे भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममधील एक प्रसिद्ध नाव आहे. दरम्यान, त्यांनी तेलंगणाचे मुख्य चीफ ऑपरेटिंग अधिकारी म्हणूनही काम केलं आहे हे अनेकांना माहीत नाही. ते बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सचे (BITS) माजी विद्यार्थी आहेत. कॉलेजदरम्यान त्यांची भेट सुधाकर पसुपुनुरी आणि चरण पद्माराजू यांच्याशी झाली. त्यानंतर तिघेही चांगले मित्र बनले.

विविध संस्थांमध्ये कामाचा अनुभव घेतल्यानंतर, तीन मित्रांनी केवळ ५ लाख रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह रेडबस सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे एक बस तिकीट प्लॅटफॉर्म आहे. याचं सध्याचं मूल्य सुमारे ७,००० कोटी रुपये आहे.

२०१३ मध्ये, RedBus दक्षिण आफ्रिकेच्या Naspers आणि चीनच्या Tencent यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या इबिबो ग्रुपनं ८२८ कोटी रुपयांना विकत घेतली. फणींद्र यांच्या नेतृत्वाखाली, रेडबसने भारतातील बस तिकीट प्रणालीत क्रांती घडवून आणली. यामुळे ते अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक झाले.

रेडबस सुरू करण्यापूर्वी फणींद्र टेक्सास इन्स्ट्रुमेंट्समध्ये इंटिग्रेटेड सर्किट्सचे डिझायनर म्हणून काम करत होते. मोठ्या गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे, रेडबस उद्योगात लगेचच मार्केट लीडर बनली.

२०१३ मध्ये जरी रेडबसचं अधिग्रहण झालं असलं तरी त्यानंतरही ते बराच काळ रेडबससोबतच राहीले. फणींद्र एक यशस्वी उद्योजक असण्यासोबतच सामाजिक उपक्रम आणि लोकोपयोगी उपक्रमांमध्येही सक्रिय आहेत. तेलंगणाचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर म्हणून त्यांच्या निपुणतेनं शासनामध्ये नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाची अंमलबजावणी वाढविण्यात योगदान दिलं आहे.