देशातील 'ही' Cyber Security कंपनी कर्मचाऱ्यांना देणार आठवड्याला तीन दिवस विक ऑफ; पाहा का घेतला हा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:58 PM2021-09-28T12:58:09+5:302021-09-28T13:08:54+5:30

कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्याचे तीन दिवस ऑफ देण्याचा घेतला निर्णय.

गेल्या अनेक दिवसांपासून आठवड्याचे तीन दिवस कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात यावी किंवा नाही यावर चर्चा सुरू आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच एका सायबर सिक्युरिटी कंपनीनं हे करून दाखवलं आहे.

सायबर सिक्युरिटी कंपनी TAC सिक्युरिटीने मुंबई कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आठवड्याची सुट्टी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

आता कंपनीतील कर्मचाऱ्यांना आठवड्याचे चार दिवस काम कारावं लागणार असल्याची माहिती सोमवारी कंपनीनं एक निवेदनाद्वारे दिली. तसंच सध्या एक प्रयोग म्हणून कंपनी याकडे पाहत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

जर पुढील सात महिन्यांमध्ये तीन दिवस सुट्टी दिल्यानंतरही प्रोडक्टिव्हीटी वाढली तर हा नियम पुढेही कायमचा लागू केला जाणार आहे.

यामुळे कर्मचाऱ्यांना काम आणि वैयक्तिक जीवनामध्ये अधिक चांगले संतुलन राखण्यास मदत होईल. आणि जेव्हा ते कामावर परततील तेव्हा ते अधिक उत्साहाने येतील. २०० कर्मचारी असलेल्या या कंपनीनं या निर्णयाचे वर्णन 'फ्यूचर ऑफ वर्क' असं केलं आहे.

कंपनीच्या आपल्या अंतर्गत सर्वेक्षणात, ८० टक्के कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ४ दिवस अधिक तास काम करण्यास सांगितलं आहे. यामुळे त्यांना दीर्घ साप्ताहिक सुट्टी दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची काळजी घेण्यास मदत मिळेल. या घोषणेनंतर, कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने विविध अभ्यासक्रम आणि उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत.

“आमची टीम आणि कंपनी तरुणांची आहे. अशा परिस्थितीत आपण कोणतेही प्रयोग करून वर्क लाईफ बॅलन्स तयार करण्यासाठी काही नवीन प्रयोग करू शकतो. आपल्या सर्वांना ५ दिवस काम करण्याची सवय आहे. म्हणूनच मी ते एक आव्हान मानतो. या नवीन प्रयोगाशी जुळवून घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल," असं मत TAC कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिश्नित अरोरा यांनी दिली.