Vi मधील माझा हिस्सा सरकारने घ्यावा; बिर्लांच्या प्रस्तावावर BJP खासदाराची सूचक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 09:49 AM2021-08-06T09:49:30+5:302021-08-06T09:55:19+5:30

कुमार मंगलम यांनी केंद्राला लिहिलेल्या पत्रात Vi मधील माझा हिस्सा सरकारने घ्यावा किंवा योग्य वाटेल, त्या कंपनीकडे द्यावा, असे म्हटल्याचे सांगितले जात आहे.

Jio ला जोरदार टक्कर देण्यासाठी Vodafone आणि Idea यांनी एकत्र येत Vi या संयुक्त कंपनीची स्थापना केली. मात्र, आर्थिक आघाडी सावरण्यास कंपनीला अपयश आल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या आणि व्यवसाय गुंडाळण्याची तयारी Vi करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रात सेवा देणे कंपनीसाठी अवघड बनले आहे. सातत्याने होणारा तोटा आणि एजीआर शुल्काचा वाढता डोंगर यामुळे Vi ची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे.

Vi चे हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी कंपनीचे मुख्य प्रवर्तक कुमार मंगलम बिर्ला यांनी स्वतःची २७ टक्के हिस्सेदारी विक्री करण्याची तयारी दर्शवली आहे. हिस्सा विक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी बिर्ला यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

आपल्याला २७ कोटी भारतीय ग्राहकांची चिंता आहे. त्यामुळे माझ्या वाट्याचा २७ टक्के हिस्सा आपण विक्री करण्यास तयार आहोत, असे सांगत कुमार मंगलम यांनी केंद्राला लिहिलेल्या पत्रात माझा हिस्सा सरकारने घ्यावा किंवा योग्य वाटेल, त्या कंपनीकडे द्यावा, असे म्हटल्याचे सांगितले जात आहे.

कुमार मंगलम बिर्ला यांच्या प्रस्तावावर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थकीत रकमेच्या बदल्यात Vi कंपनीचे अधिग्रहण सरकारने करावे, असे कुमार मंगलम बिर्ला यांचे म्हणणे आहे. हे खरे असेल, तर हा प्रस्ताव अत्यंत हास्यास्पद आहे.

Vi सारखा पांढरा हत्ती सरकार खरेदी करू शकत नाही. बिर्ला यांनी आपल्या कर्जात बुडलेल्या कंपनीऐवजी नफ्यात असलेल्या कंपनीची पेशकश करावी, असा सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. दरम्यान, कुमार मंगलम बिर्ला यांच्या पत्रावर सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तत्पूर्वी, कुमार मंगलम बिर्ला यांचा तडकाफडकी राजीनामा आणि पालक कंपनी व्होडाफोनने नव्याने गुंतवणूक करण्यास नकार दिल्याने Vi चे भवितव्य डळमळीत बनले आहे. याचे पडसाद शेअर मार्केट उमटले आहेत.

सलग दोन सत्रात वोडाफोनचे शेअर तब्बल ३७ टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनी पुनरागमन करेल, या आशेवर बसलेले हजारो गुंतवणूकदार या पडझडीत होरपळून निघाले आहेत. आतापर्यंत कंपनीचे बाजार भांडवल २,७०० कोटी घसरले आहे.

Vi मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांची २७ टक्के हिस्सेदारी आहे. तर व्होडाफोनकडे ४४ टक्के हिस्सा आहे. Vi वर सध्या १.८ लाख कोटींचे कर्ज आहे. कंपनीने ५८ हजार २५४ कोटींचा एजीआरही थकवला आहे. या थकीत रकमेपैकी आतापर्यंत Vi ने केवळ ७ हजार ८५४ कोटी रुपये भरले आहेत.

सप्टेंबर २०२० मध्ये Vi च्या संचालक मंडळाने २० हजार कोटी भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वर्षभरानंतर यातून काही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून, Vi मध्ये गुंतवणुकीस इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांना सुस्पष्ट धोरण हवे आहे.

दरम्यान, एजीआरची मोजदाद कशी करायची यावरून सरकार आणि दूरसंचार कंपन्यांत मतभेद झाले होते. त्यावरून कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.

प्राप्त माहितीनुसार, कंपन्यांकडे एजीआरपोटी १.२० लाख कोटी रुपये थकले आहेत. त्यात सर्वाधिक ५०,३९९ कोटींची थकबाकी Vi ची आहे. भारती एअरटेलकडे २५,९७६ कोटी थकले आहेत.