एअर इंडिया आणि विस्ताराचे विलीनीकरण लांबणीवर? CCI ची दोन्ही कंपन्यांना नोटीस...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 04:47 PM2023-06-28T16:47:39+5:302023-06-28T16:50:14+5:30

Air India-Vistara Merger: भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा विलीनीकरण करार अडचणीत आला आहे.

Air India-Vistara Merger: टाटा समूहाने एअर इंडिया विकत घेतल्यापासून ते एअरलाइनला जगातील सर्वात मोठी एअरलाइन्स बनवण्याचा प्रयत्नात आहेत. यामुळेच आता टाटा समूहाने आपली दुसरी एअरलाइन्स विस्तारा, एअर इंडियामध्ये विलीन करण्याची योजना आखली आहे. परंतु आता हा विलीनीकरण करार अडचणीत येण्याची शक्यता आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) टाटा समूहाला या कराराबद्दल नोटीस पाठवली आहे.

भारतीय बाजारपेठेतील स्पर्धा टिकवून ठेवण्यासाठी काम करणाऱ्या सीसीआयने एअर इंडिया आणि विस्तारा यांच्या विलीनीकरणाला तत्काळ परवानगी दिली नाही, उलट या कराराबाबत दोन्ही विमान कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. सीसीआयला या दोन्ही विमान कंपन्यांच्या विलीनीकरणाचा बाजारावर काय परिणाम होईल, हे पाहायचं आहे.

CCI ने एअर इंडिया आणि विस्तारा यांना स्वतंत्र नोटीस पाठवून दोन्ही एअरलाईन्सच्या विलीनीकरणाच्या परिणामाबाबत चौकशी करावी असे सांगितले आहे. आता यासाठी दोन्ही विमान कंपन्यांनी सीसीआयला त्यांचे उत्तर पाठवावे लागेल. सीसीआयच्या तपासामुळे एअर इंडिया आणि विस्तारा यांच्या विलीनीकरणाला विलंब होऊ शकतो.

सीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, ही प्रक्रिया सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. या प्रक्रियेत दोन्ही कंपन्या आणि CCI यांच्यात सविस्तर चर्चा होईल. या तपासाला 210 दिवसापर्यंत लागू शकतात. विस्तारा आणि एअर इंडियाच्या विलीनीकरणाच्या मंजुरीसाठी टाटा समूहाने 19 एप्रिल रोजी CCI कडे अर्ज केला होता. टाटा समूहाने मार्च 2024 पर्यंत त्यांच्या सर्व एअरलाईन्स व्यवसायांना एकत्र करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

एअर इंडिया आणि एअर विस्तारा व्यतिरिक्त, टाटा समूह आणखी दोन विमान कंपन्यांचे विलीनीकरण करत आहे. AirAsia India, एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये विलीन होत आहे. या एअरलाइन्स लो कॉस्ट मार्केटमध्ये इंडिगो, अकासा एअर, गोफर्स्ट आणि स्पाइसजेटशी स्पर्धा करतील. टाटा समूहाच्या सर्व विमान कंपन्यांचा देशांतर्गत बाजारातील हिस्सा 23.9 टक्के आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 23.10 टक्के आहे. विलीनीकरणानंतर ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी बनेल.